टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली याला गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने धावांसाठी संघर्ष करावा लागत आहे. विराटने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पर्थ कसोटीत खणखणीत शतक झळकावत अफलातून सुरुवात केली होती. मात्र विराटला त्याच्या या कामगिरीत सातत्य राखता आलं नाही. विराटला बॉर्डर गावसकर ट्रॉफीत धावांसांठी संघर्ष करावा लागला. विराटने त्यानंतर अनेक वर्षांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये कमबॅक केलं. विराट इथेतरी मोठी खेळी करेल, अशी आशा क्रिकेट चाहत्यांना होती. मात्र विराट इथेही फ्लॉप ठरला. विराट 6 धावा करुन आउट झाला. मात्र विराटला आता इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे.
टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात 5 सामन्यांची टी 20I मालिका 4-1 अशा फरकाने जिंकली. त्यानंतर आता उभयसंघात एकूण 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार आहे. विराटला या मालिकेत एकदिवसीय क्रिकेटमध्ये 14 हजार धावांचा टप्पा गाठण्याची संधी आहे. आतापर्यंत वनडे क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर आणि कुमार संगकारा या दोघांनाच 14 हजार धावा पूर्ण करता आल्या आहेत.
विराटला वेगवान 14 हजार एकदिवसीय धावा पूर्ण करत सचिनचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे. विराटच्या नावावर सद्यस्थितीत 295 एकदिवसीय सामन्यांमधील 283 डावांमध्ये 13 हजार 906 धावांची नोंद आहे.त्यामुळे विराटला आणखी 94 धावांची गरज आहे. त्यामुळे विराटने 3 सामन्यांमध्ये 94 धावा केल्या तर तो वेगवान 14 हजार धावा करणारा पहिला फलंदाज ठरेल.
हे सुद्धा वाचा
सचिनने 350 तर संगकारा याने 378 डावांमध्ये 14 हजार एकदिवसीय धावा पूर्ण केल्या होत्या. तसेच विराटने याआधी वनडेत 10 आणि 11 हजार धावांचा टप्पा सर्वात वेगवान पद्धतीने गाठला होता. त्यामुळे आता विराट या मालिकेत वेगवान 14 हजार एकदिवसीय धावा पूर्ण करण्याची कामगिरी करतो का? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
वनडे सीरिजसाठी इंग्लंड टीम : जोस बटलर (कॅप्टन), जोफ्रा आर्चर, गस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, जो रूट, साकिब महमूद, फिल सॉल्ट आणि मार्क वुड.
वनडे सीरिजसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा आणि हर्षित राणा (बुमराहचा बॅकअप).