या काळात आठ ते दहा दिवसांनी पाणी उपलब्ध होत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी दाहीदिशा फिरावे लागले, परंतु सध्या जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या कालावधीत चांगला पाऊस झाला. नाझरे व वीर धरण भरून वाहू लागले.
धरणे भरल्याने पाणीटंचाई दूर होणार असे चित्र असताना सध्या ही तीन दिवसांतून एकदा पिण्याचे पाणी मिळत असल्याने नागरिकांना पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही.आजही खासगी टँकरद्वारे नागरिक, हॉटेल्स, लॉजधारकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे.
दररोज पाणीपुरवठ्यासाठी दीड वर्ष थांबावे लागणार
महाराष्ट्र शासनाच्या वतीने नुकतीच वीर धरणावरून जेजुरीसाठी पिण्याच्या पाण्यासाठी योजना मंजूर झाली असून, या योजनेचे टेंडर ही निघाले आहे. या योजनेत सुमारे 13 एमएलडी पाणी क्षमतेची पाण्याची टाकी उभारली जाणार आहे.
ही योजना दीड वर्षानंतर पूर्ण होणार असून, त्यानंतर शहराचा कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. नागरिकांना दररोज पिण्याचे पाणी मिळण्यासाठी आणखी दीड वर्ष प्रतीक्षा करावी लागणार आहे.
जेजुरी शहराला सध्या नाझरे धरणातून तीन दिवसांनी एकदा पाणीपुरवठा केला जातो. नाझरे धरणावर पाणी उपसा करण्यासाठी 180 आणि 75 अश्वशक्तीचे पंप असून, मागणीनुसार ही क्षमता कमी आहे. जेजुरी येथील जलशुध्दीकरण केंद्र आणि शहरात असणार्या पाण्याच्या टाक्यांची पाणी साठवण क्षमता कमी असल्याने दररोज पाणीपुरवठा होऊ शकत नाही. नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेचा सतत प्रयत्न असतो.
- चारुदत्त इंगुले, मुख्याधिकारी, जेजुरी न. पा.