अण्णाभाऊंच्या पुतळ्यासाठी मुहूर्त लागेना
निलंगा (Matang Samaj) : लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यासाठी निलंग्यात स्थानिक आमदार संभाजीराव पाटील यांनी अनेक ठिकाणी जागेचे भूमिपूजन केले. मात्र आजपर्यंत पुतळा उभारण्यात आला नाही. याबद्दल मातंग समाजामध्ये तीव्र संताप पसरला असून तात्काळ पुतळा बसवावा, या मागणीसाठी निलंगा उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनेचे तालुकाध्यक्ष रामभाऊ कांबळे यांनी शुक्रवारपासून उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला विविध पक्ष व संघटनांनी पाठिंबा दिला आहे.
क्रांतीवीर लहुजी शक्ती सेनेचे उपोषण
रामभाऊ कांबळे यांंच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. मागील अनेक वर्षापासून निलंगा शहरात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्याची मागणी करण्यात येत आहे. याबाबत अनेक वेळा निवेदने देण्यात आले. मोर्चे, उपोषणेही करण्यात आले. मात्र या मागणी संदर्भात अद्याप कसलाही विचार करण्यात आलेला नाही.
स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्षच केले आहे. त्यांनी अनेकवेळा अनेक ठिकाणी पुतळयासाठी जागेचे भूमिपूजन केले होते. मात्र आजपर्यंत पुतळा बसविण्यात आलेला नाही.
याबद्दल मातंग समाज पूर्णतः संघर्षाच्या तयारीत आहे. मातंग समाजाच्या मागण्याची त्वरित दखल घेवून नगर परिषद निलंगा येथील गार्डनमध्ये अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा तात्काळ उभा करण्याचे काम चालू करण्यात यावे; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रामभाऊ कांबळे यांनी दिला आहे. या उपोषणास विविध पक्ष व संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी पाठींबा दिला आहे.
चौथ्यांदा भूमिपूजन अन् मातंग समाजाची दिशाभूल!
फसव्या आमदाराच्या आश्वासनांविरोधात मातंग समाजाचे नेते राम कांबळे यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांना काँग्रेस पक्षातर्फे पाठिंबा देण्यात आला आहे. प्रदेश सचिव अभय दादा साळुंके, तालुका अध्यक्ष विजयकुमार पाटील, आणि शहराध्यक्ष अजित नाईकवाडे यांनी उपोषण स्थळी जाऊन राम कांबळे यांची भेट घेतली व त्यांना आपला ठाम पाठिंबा व्यक्त केला. काँग्रेसने म्हटले आहे की, निलंग्याचे आमदार यांनी 2014 साली केंद्रीय शाळा आनंदमुनी चौक येथे पुतळा उभारण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ते वारंवार ठिकाण बदलत राहिले, जसे की टाऊन हॉल, मातंग स्मशानभूमी इत्यादी. गत १५ ऑगस्ट २०२४ रोजी चौथ्यांदा नगरपालिकेच्या आवारात पुतळा उभारण्याचे उद्घाटन (भूमिपूजन) करण्यात आले आणि १५ दिवसांत अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवण्यात येईल, असे खोटे आश्वासन दिले. या प्रकारामुळे समाजाची फसवणूक झाली आहे. काँग्रेस पक्षाने यावेळी कांबळे यांना पाठिंबा देत, समाजाच्या हक्कांसाठी लढाई पुढे नेण्याचा निर्धार केला आहे.