परभणी (Parbhani):- मराठा समाजास जोपर्यंत ओबीसीचे आरक्षण मिळत नाही तोपर्यंत इडब्ल्यूएसचे (EWS)आरक्षण पूर्ववत चालू ठेवावे, अशी मागणी मराठा आरक्षण संघर्ष समन्वय समितीचे अध्यक्ष सुभाष जावळे पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण मैदानात पत्रकार परिषदेत केली. त्यांच्या प्राणांतीक उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे.
परभणीत सुभाष जावळे पाटील यांचे चौथ्या दिवशीही उपोषण सुरू
उपोषण मैदानावर मागील चार दिवसांपासून सुभाष जावळे यांचे प्राणांतीक उपोषण सुरू असून शनिवार २८ सप्टेंबर रोजी पत्रकार परिषदेचे(Press conference) आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुधाकर माने, धनाजी येळकर, विठ्ठल तळेकर, बाबासाहेब बचाटे, नितीन देशमुख, कृष्णा देशमुख, रामेश्वर शिंदे आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलतांना जावळे म्हणाले, २२ मार्च १९८३ पासून हा मराठा आरक्षणाचा लढा सुरू झाला तेंव्हापासून प्रत्येक आंदोलनात मी सहभागी झालो आहे. आजपर्यंत ३५० पेक्षा जास्त मावळ्यांनी या लढयात बलीदान दिले आहे. २०१६ मध्ये ४८ पेक्षा जास्त मराठा क्रांती मोर्चे निघाले होते. सध्या सरकारने आम्ही मागत असलेले ओबीसी (OBC)आरक्षणा ऐवजी एसईबीसीचे आरक्षण दिल्यामुळे इडब्ल्यूएसचे आरक्षण काढून घेण्यात आले. यामुळे समाजातील अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्यामुळे जोपर्यंत मराठा समाजास ओबीसी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत इडब्ल्यूएस आरक्षण चालू ठेवावे. तसेच मराठवाडयातील मराठा समाजास निजाम गॅजेट प्रमाणे कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, सर्व मुलां-मुलींना मोफत शिक्षण द्यावे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या जाचक अटी रद्द करावे या व इतर मागण्या त्यांनी सरकारकडे केल्या आहेत.