Published on
:
30 Sep 2024, 9:33 am
Updated on
:
30 Sep 2024, 9:33 am
बोर्लीपंचतन : दिघी कोळीवाड्यातील कोळी समाजाच्या महिलांनी अवैद्य दारूचे धंदे बंद करावे अशी मागणी केली आहे. यासाठी एकत्र येत समाज कमिटीकडे तक्रार केली आहे. कोळीवाडा हद्दीतील अवैद्य दारूचे धंदे बंद झाले नाही तर पंचक्रोशीतील जन आक्रोश आंदोलन करू असा इशारा दिला आहे.
मागील काही वर्षांपासून ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय दिघी गावामध्ये खुलेआमपणे विनापरवाना दारू विक्री सुरू असल्याचे गावातून नागरिकांकडून , विशेषता महिलांकडून बोलले जात आहे. तसेच हे धंदे बंद करावे यासाठी महिलांची ग्रामपंचायतिकडे नेहमी मागणी असून याकडे गृप ग्रामपंचायत कार्यालय दिघी कडून दारू बंदी करण्यासाठी कोणीही तसे प्रयत्न केले नाहीत. विनापरवाना मद्य-दारू विक्री कायमस्वरूपी बंद करण्यासाठी पंचक्रोशीतील महिलांनी कायदेशिर , संवैधानिक मार्गाने संघटित होऊन अनेक वेळा प्रयत्न केले परंतू सदर प्रयत्नांना संबंधित शासकिय यंत्रणांकडून योग्य आणि आवश्यक सहकार्य मिळाले नाही व मिळत नाही. तसेच सदर विनापरवाना मद्य दारू विक्रीधारकांना संबंधित स्थानिक राजकिय कार्यकर्ते आणि संबंधित शासकिय यंत्रणांकडूनच प्रोत्साहन, सहकार्य मिळत असल्याची उद्विग्न भावना महिलांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संबंधित शासकिय परिपत्रकातील तरतुदींनुसार सदर विनापरवाना अनधिकृतरित्या सुरू असलेली मद्य दारू विक्री कायमस्वरूपी बंद करण्यासाठी आवश्यक सर्व कायदेशिर, संवैधानिक मार्गाचा अवलंब करून लवकरात लवकर आम्हा महिलांचे उध्वस्त होणारे संसार थांबवावे.
अंखड भारताचे उज्वल भविष्य असलेली तरूण पिढी व्यसनमुक्त करण्यासाठी शासकीय, सामाजिक स्तरावर आणि लोकप्रतिनिधी यांनी योग्य ते प्रामाणिक, निस्वार्थी प्रयत्न करून महिलांना निस्वार्थीपणे न्याय द्यावा अशी विनंती दिघी हिंदू महादेव कोळी समाजातील महिलांनी गावातील पंच कमिटी सह संबंधित शासकीय यंत्रणा, लोकप्रतिनिधी यांस केली आहे.
दारूमुळे आतापर्यंत अनेक महिलांचे संसार उद्धस्त झाले असून अनेक संसार उद्धस्त होण्याच्या मार्गावर आहेत. देशाचे भवितव्य असलेली तरूण पिढी व्यसनाच्या आहारी गेली असून अनेक तरूण बेरोजगार झाले आहेत. समाजातील महिलांनी आपल्या समस्यांच्या व्यथा नवनिर्वाचित पंच कमिटी कडे मांडल्या आहेत. नवनिर्वाचित पंच कमिटी ने सामजिक हिताच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी शासकीय यंत्रणा, सामाजिक स्तरावर आणि लोकप्रतिनिधी यांचेकडे कायदेशिर आणि संवैधानिक मार्गाने लेखी पत्रव्यवहार करून समस्यांचे निवारण करण्याचे प्रमाणिक प्रयत्न केले जातील असे आश्वासन समाजातील महिलांना दिले आहे. संबंधित शासकीय यंत्रणा, लोकप्रतिनिधी यांनी दारू बंदी करण्यासाठी ठोस पावले उचलून दारू बंदी न केल्यास ग्रामपंचायत, स्थानिक पोलिस ठाणे यांसह संबंधित वरीष्ठ शासकीय कार्यालयांत जन आक्रोश आंदोलन करू असा इशारा पंचक्रोशीतील महिलांनी दिला आहे.
काही दिवसांपूर्वीच दिघी हिंदू महादेव कोळी समाजाच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी स्विकारली असून सर्व सत्य परिस्थिती समजून घेऊन संबंधित शासकीय यंत्रणा, लोकप्रतिनिधींकडे पत्रव्यवहार करून लवकरात लवकर महिलांना न्याय मिळवून देण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले जातील.
- प्रकाश गोवारी, अध्यक्ष दिघी हिंदू महादेव कोळी समाज कोळीवाडा