Published on
:
30 Sep 2024, 3:35 pm
Updated on
:
30 Sep 2024, 3:35 pm
माजलगाव : उपमुख्यमंत्री अजित पवार मंगळवारी माजगाव शहरात जनसन्मान यात्रेसाठी येणार आहेत. या कार्यक्रमासाठी कार्यक्रमस्थळी वीज चोरून घेण्यात आली आहे. उपमुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमाला परवानगी न घेताच विजेचा वापर होत असल्यामुळे यावर कारवाई होणार का? याकडे मतदारसंघातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
मागील अनेक दिवसापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जल सन्मान यात्रा महाराष्ट्रभर फिरून मंगळवारी याचा परळी येथे समारोप होणार आहे. त्यापूर्वी सकाळी ११ वाजता मंगलनाथ मैदानावर या यात्रेनिमित्त भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभास्थळी मागील चार दिवसापासून भव्य अशा मंडप उभारणीचे काम सुरू आहे. तेव्हापासून जवळच असलेल्या एका विजेच्या खांबावरून डायरेक्ट आकडे टाकून विजेचा वापर सुरू आहे. यासाठी संबंधित मंडप उभारणीवाल्यांनी वीज वितरण कंपनीकडून यासाठी कसल्याच प्रकारची परवानगी घेतली नसल्याचे देखील सांगण्यात येत आहे.
तीन दिवसांपूर्वी कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी विचारणा केली असता आम्ही जनरेटर लावून विजेचा वापर करत असल्याचे सांगितले होते. मात्र, सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास विजेच्या खांबावर आकडे टाकून वीज घेतल्याची बाब महावितरण कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आली.
गेल्या ३-४ दिवसांपासून या ठिकाणी आकडे टाकून वीज चोरी करण्यात येत आहे. असा प्रकार कोणी सर्वसामान्यांनी केला असता तर वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई केली असती, परंतु हा प्रकार वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना माहीत असताना देखील त्यांनी अद्याप कारवाई केली नसल्यामुळे या अधिकाऱ्यांची वीज चोरीसाठी मुख संमती तर नाही ना असा प्रश्न देखील उपस्थित होऊ लागला आहे.
शहरात होणारे जनसन्मान यात्रेसाठी वीज वितरण कंपनीकडून तात्पुरत्या मीटर साठी परवानगी घेण्यात आलेली नाही. दोन दिवसापूर्वी आम्ही जाऊन पाहणी केली असता डीपी वरून फक्त फोकस साठी लाईट घेण्यात आली होती. कार्यक्रमावेळी जनरेटर चा वापर करणार असल्याचे या ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्तीने सांगितले होते.
कल्पना सांगोलकर , कनिष्ठ अभियंता ,विज वितरण कंपनी माजलगाव शहर