भारतीय आयुर्वेद संस्थेच्या ८ व्या स्थापन दिनानिमित्त उद्घाटन करताना राष्ट्रपती मुर्मुPudhari Photo
Published on
:
09 Oct 2024, 2:47 pm
Updated on
:
09 Oct 2024, 2:47 pm
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा-
आयुर्वेद ही जगातील सर्वात जुनी वैद्यकीय प्रणाली आहे. तसेच आयुर्वेद हा आपला वारसा आहे आणि हा वारसा एक उत्तम वैद्यकीय व्यवस्था म्हणून स्थापित करण्यासाठी आयुष मंत्रालय कार्यरत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. दिल्लीस्थित अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या ८ व्या स्थापन दिनानिमित्त त्या बोलत होत्या. यावेळी आयुष औषधी कार्यक्रमाची सुरूवात आणि शाश्वत आयुष प्रदर्शनाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आले.
आयुष मंत्रालयाअंतर्गत अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या स्थापना दिन कार्यक्रमाला दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना, केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आयुष सचिव राजेश कोटेचा, अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या संचालक डॉ. तनुजा नेसारी, आयुष मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि वरिष्ठ प्राध्यापक उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, आयुर्वेद हे मन, शरीर आणि आत्मा यांच्यात सुसंवाद प्रस्थापित करण्यावर भर देते. २०१४ मध्ये आयुष मंत्रालय स्थापना झाल्यापासून या मंत्रालयाने पारंपारिक वैद्यकीय प्रणालींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत, याचा आनंद आहे. तसेच आयुष मंत्रालयाने शिक्षण, संशोधन, औषधांची गुणवत्ता नियंत्रण, औषध आणि सार्वजनिक आरोग्य या क्षेत्रात अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत, असेही त्या म्हणाल्या.
यावेळी बोलताना मंत्री प्रतापराव जाधव म्हणाले की, राष्ट्रपतींनी अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेला भेट दिली, हा आयुष मंत्रालयासाठी ऐतिहासिक दिवस आहे. नुकतीच पंतप्रधानांनी घोषणा केली की येत्या पाच वर्षांत देशात १० नवीन आयुर्वेद संस्था सुरू करण्यात येतील. आयुर्वेद जगात वेगाने लोकप्रिय होत आहे. ग्रामीण भागात स्वस्त आयुर्वेदिक औषधे उपलब्ध करून देण्यासाठी आयुष मंत्रालयाने 'आयुष औषधी केंद्र' सुरू केले असल्याची माहिती त्यांनी दिली.