एमपीएससी विद्यार्थी पुन्हा संभ्रमित:राज्यसेवा परीक्षा 2022चा अंतिम निकाल आणि नियुक्ती प्रक्रिया रखडल्या

2 hours ago 2
राज्य शासनातील 'गट अ ' आणि ' गट ब 'अशा विविध संवर्गातील एकूण ६२३ पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा-२०२२ परीक्षेची जाहिरात दि.११ मे २०२२ रोजी प्रसिद्ध झाली. सदरची पूर्व परीक्षा दि. २१ ऑगस्ट २०२२ रोजी होऊन मुख्य परीक्षा दि. २१ ते २३ जानेवारी २०२३ रोजी पार पडली. मुलाखत कार्यक्रम सुमारे एक वर्ष उलटल्यानंतर डिसेंबर ते जानेवारी २०२४ या कालावधीत पार पडला. यानंतर या परीक्षेची गुणवत्ता यादी दि.१८ जानेवारी २०२४ रोजी जाहीर होऊन दि. २० मार्च २०२४ रोजी तात्पुरती निवड यादी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे जाहीर करण्यात आली. परंतु याबाबत अद्याप पुढील प्रक्रिया रखडल्याने एमपीएससीचा सावळा गोंधळ समोर आला असून विद्यार्थी यामुळे संभ्रमित झालेले आहेत. सागर वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, दरम्यानच्या कालावधीत खेळाडूंचे प्रमाणपत्र, समांतर आरक्षण, दिव्यांग उमेदवाराच्या दाव्यांची फेरपडताळणी आदी संदर्भामध्ये काही दावे महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणमध्ये (मॅटमध्ये) दाखल झाले. सर्व दावे निकाली निघाले असून सद्यस्थितीत सदर परीक्षेच्या अनुषंगाने कोणतेही न्यायालयीन प्रकरण प्रलंबित नाही. परिणामी अंतिम निकाल जाहीर करण्यास कसलीही अडचण नाही. तरीही अंतिम निकाल, उमेदवारांची शासनाकडे शिफारस आणि शासनातर्फे प्रत्यक्षात नियुक्ती या प्रक्रिया सुमारे २ वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊन देखील रखडल्या आहेत. दि.११ मे २०२२ रोजी सदर परीक्षेकरिता जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून आज पर्यंत दोन वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटला आहे. यापरीक्षेमधून निवड झालेले उपजिल्हाधिकारी, पोलिस उपअधीक्षक, गटविकास अधिकारी, शिक्षणाधिकारी, मुख्याधिकारी, तहसीलदार, मंत्रालयीन कक्ष अधिकारी आदी. विविध संवर्गातील ६०० पेक्षा जास्त अधिकारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. निवड झालेले बहुतांश उमेदवार ग्रामीण भागातील असून आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे. स्पर्धा परीक्षा तयारीसाठी तरुणाईची ऐन उमेदीची पाच ते सात वर्ष देऊन, रोज १० ते १२ तास अभ्यास करून अपार कष्टातून निवड होऊनही नियुक्तीसाठी संघर्ष करत आहेत. परिणामी, उमेदवारांना आर्थिक तसेच सामाजिक विवंचनेला सामोरे जावे लागत आहे. तसेच नियुक्तीस होणाऱ्या विलंबामुळे भविष्यात सेवांतर्गत बाबीसंदर्भात अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सदर परीक्षेची प्रक्रिया पूर्ण होण्यास होणाऱ्या विलंबाबाबत अधिकृतरित्या सुचनापत्रक, प्रसिदधीपत्रक काहीही जाहीर केलेले नाही. अंतिम निकाल प्रसिद्ध होऊन नियुक्ती होण्यास आणखी किती कालावधी जाईल याबाबत अनिश्चितता आहे. त्यामुळे अंतिम निकाल जाहीर करून तात्काळ नियुक्ती मिळणेबाबत उमेदवार शासनाकडे मागणी करीत आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article