ऑलिम्पिकवीर स्वप्नीलच्या वडिलांची सरकारवर टीका:5 कोटींच्या बक्षीसाची केली मागणी, सरकार पक्षपाती असल्याचा केला आरोप

2 hours ago 1
कोल्हापूरच्या स्वप्नील कुसळेने यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 मीटर रायफल स्पर्धेत कांस्य पदक जिंकून भारताची मान उंचावली. खाशाबा जाधव यांच्यानंतर प्रथमच महाराष्ट्राच्या एका तरुणाने ऑलिम्पिकमध्ये पकद मिळवले. त्यानंतर राज्य सरकारने स्वप्नीलला 1 कोटींचे बक्षीस जाहीर केले. पण आता त्याच्या वडिलांनी त्याला 1 कोटी नव्हे तर 5 कोटींचे बक्षीस द्यावे अशी मागणी केली आहे. या प्रकरणी त्यांनी राज्य सरकारवर पक्षपातीपणाचा आरोपही केला आहे. सुरेश कुसळे मंगळवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, स्वप्नीलला ऑलिम्पिकचे पदक मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याला 1 कोटींची मदत करण्याची घोषणा केली होती. पण ती मदत फारच तोकडी आहे. राज्य मंत्रिमंडळाने 2 दिवसांपूर्वीच सुवर्णपदक जिंकणाऱ्याला 5 कोटी, रौप्य पदक जिंकणाऱ्याला 3 कोटी व कांस्य पदक जिंकणाऱ्याला 2 कोटींचे बक्षीस देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी हा निर्णय ऑलिम्पिक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी घेण्याची गरज आहे. आता स्वप्नीलला 5 कोटींचे बक्षीस द्यावे अशी आमची मागणी आहे. दिवसाकाठी काडतुसांचाच खर्च 30 हजार स्वप्नीलने आगामी काळात सुवर्णपदक जिंकण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. त्यामु्ळे त्यासाठी खूप मोठा खर्च येणार आहे. त्यामुळे आमच्यापुढे 5 कोटींशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. माझ्या अंदाजानुसार 2028 पर्यंत त्याच्यावर जवळपास 3 कोटी रुपयांचा खर्च होईल. आता त्याला साधी बंदूक घेऊन चालणार नाही. त्याला चांगल्या प्रकारची साधने लागतील. दिवसाला जवळपास 250 ते 300 काडतुस फायरिंगसाठी लागतील. एका काडतुसाची किंमत जवळपास 100 रुपये असते. त्यामुळे या काडतुसांचाच खर्च दिवसाठी 30 हजार रुपयांवर जातो. त्यामुळे एवढा खर्च आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाला परवडणार नाही. शासन या प्रकरणी एवढे उदासिन आहे हे मला माहिती असते तर मी माझ्या मुलाला नेमबाजीसाठी पाठवलेच नसते, अशी खंतही सुरेश कुसळे यांनी यावेळी व्यक्त केली. मंत्री किंवा आमदाराचा मुलगा असता तर... सुरेश कुसळे यांनी यावेळी स्वप्नील सर्वसामान्य कुटुंबातील असल्यामुळेच त्याचा यथोचित सन्मान झाला नसल्याचाही आरोप केला. स्वप्नील सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा आहे. त्याला राजकीय पाठिंबा नाही. म्हणून सरकारने त्याला तोकडे बक्षीस दिले. हाच मुलगा एखाद्या मंत्र्याचा किंवा आमदाराचा असता तर सरकारने काय केले असते? राज्य सरकारने त्याला किमान 5 कोटींचे बक्षीस द्यावे अशी माझी मागणी आहे. एवढेच नाही तर त्याला बालेवाडीलगत एखादा फ्लॅटही मिळावा. तेथील रेंजला स्वप्नीलचे नाव द्यावे. आगामी काळात त्याला देशासाठी सुवर्णपदक जिंकायचे आहे, असे ते म्हणाले. क्रिकेटपटूंचा सन्मान, पण ऑलिम्पिकपटूकडे दुर्लक्ष क्रिकेट विश्वचषक जिंकल्यानंतर 5 व्या दिवशी सरकारने महाराष्ट्राच्या 3 खेळाडूंना विधानभवनात बोलावून 11 कोटींचे बक्षीस जाहीर केले. पण ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून 2 महिने 6 दिवस झाले तरी शासनाने अद्याप त्याला विधानभवनात बोलावून साधे फुलही दिले नाही. त्यांना ऑलिम्पिक पदकाची काही किंमत आहे की नाही हा प्रश्न आहे, असेही सुरेश कुसळे यावेळी आपला रोष व्यक्त करताना म्हणाले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article