Published on
:
02 Oct 2024, 1:57 pm
Updated on
:
02 Oct 2024, 1:57 pm
ठाणे : कळवा परिसरातील सहकार विद्यालयात विद्यार्थ्यांना झालेल्या विषबाधा प्रकरणात शाळा प्रशासन आणि पोषण आहार पुरवणाऱ्या पुरवठा दारावर निष्काळजीपणाचा गुन्हा दखल करण्यात आला आहे. पालकांच्या तक्रारीनंतर कळवा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये तक्रारीमध्ये मात्र कोणाची नावे टाकण्यात आली नाहीत अशी माहिती कळवा पोलिसांनी दिली आहे.
पोषण आहार मुलांना देण्यापुर्वी शिक्षकांनी हा आहार खाऊन बघायचा असतो मात्र तसेही करण्यात आले नाही. मटकीचा वास येत होता तर ती मुलांना का देण्यात आली? असे अनेक प्रश्न पालकांनी उपस्थित केले आहेत. या सर्व प्रकारात शाळा प्रशासनाचा तसेच पुरवठादाराचा हलगर्जीपणा समोर आला असल्याने याविरोधात अखेर पालकांनी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. कळवा पोलिसांनीही पालकांच्या तक्रारीवरून शाळा प्रशासन आणि पुरवठादार याच्यावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांनी दिली आहे.
प्रकरणाची सखोल चौकशी करा : शिक्षणमंत्री
कळव्यातील ३८ विध्यार्थ्यांना विषबाधा झाल्यानंतर मंगळवारी रात्री कळवा रुग्णालयात तातडीची बैठक बोलवण्यात आली. या बैठकीत पालिकेचे वरिष्ठ अधिकारी, पोषण आहार पुरवणारी संस्था,शाळा प्रशासन आणि शिक्षणाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, आहाराची तपासणी न करताच मंगळवारी विध्यार्थाना देण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली. टीमउळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यानी दिली आहेत.
ठाण्यातील अनुदानित शाळांना शालेय पोषण आहार पुरविण्यासाठी शासनाने आशीर्वाद महिला मंडळ या संस्थेला ठेका दिला आहे. सहकार विद्या प्रसारक मंडळाच्या शाळेलाही याच संस्थेकडून पोषण आहार दिला जातो. दरम्यान विषबाधा घटनेनंतर ज्या ठिकाणी अन्न बनवले जाते त्याठिकाणी जाऊन अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने पाहणी केली. यामध्ये काही त्रुटी आढळून आल्याने एफडीआय ने दुकानाला सील ठोकले आहे. याप्रकरणी अधिक चौकशी सुरु असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
रात्री उशिरापर्यंत ४५ विद्यार्थी दाखल...
मंगळवार रात्रीपर्यंत उशिरापर्यंत एकूण ४५ विद्यार्थ्यांना कळवा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यातील ३७ विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना २४ तास निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. त्यानंतर त्यांना संध्याकाळी पाच वाजता सुट्टी देण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे .तर उर्वरित आठ विद्यार्थ्यांमध्ये ताप व उलट्या ही लक्षणे दिसत आहेत. त्यांना अजून बारा तास भरती ठेवावे लागणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.