केंद्र आणि राज्य सरकार आदिवासी आणि बहुजन विरोधी:काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांची टीका

3 hours ago 1
देशाच्या सर्वोच्च पदावर आदिवासी महिला बसावी, हे राष्ट्रपिता महात्मा गांधींचे स्वप्न होते. यासाठी काँग्रेसने वंचित बहुजन आदिवासींच्या विकासासाठी कायम काम केले. मात्र मणिपूरमधील आदिवासी महिलांवर अत्याचार, राम मंदिर व नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाला राष्ट्रपती महोदयांना न बोलवणे या विचारांचे लोक सत्तेवर आहेत. सध्याचे केंद्र व राज्य सरकार ही आदिवासी गरीब आणि बहुजन यांच्या विकासाच्या विरोधी असल्याची टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली. आदिवासी व सर्वसामान्यांच्या विकासासाठी काँग्रेसच्या पाठिशी उभे रहा, असे आवाहन त्यांनी केले. कोळवाडे येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती व जयहिंद आदिवासी आश्रम शाळेच्या ३० व्या वर्धापनदिनाच्या निमित्त गुरुवारी आयोजित आदिवासी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. दुर्गाताई तांबे, ॲड. माधवराव कानवडे, डॉ. जयश्रीताई थोरात, आदिवासी विकास परिषदेचे अध्यक्ष लकी जाधव, बाबासाहेब ओहोळ, रणजीतसिंह देशमुख आदी उपस्थित होते. आमदार थोरात म्हणाले, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी स्थापन केलेल्या येथील आदिवासी आश्रमशाळेने राज्यात गुणवत्तेने कायम प्रथम क्रमांक मिळवला. या शाळेमुळे अनेक कुटुंबांच्या जीवनात आनंद निर्माण झाला. आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये मोठी गुणवत्ता असून त्यांना संधी मिळाली, तर ते अत्यंत प्रामाणिकपणे काम करतात. या परिसराने कायम आपल्यावर प्रेम केले. आदिवासी बांधवांसाठी श्रीमती सोनिया गांधी यांच्या पुढाकारातून २००६ मध्ये वन जमिनी बाबतचा कायदा झाला. आपण महसूल मंत्री असताना आदिवासींची नावे त्या उताऱ्यावर आली. काँग्रेसने कायम आदिवासी व गोरगरिबांच्या विकासाचे काम केले असून सध्याचे भाजप आघाडी सरकार मात्र बहुजनांच्या आणि आदिवासींच्या विरोधात आहे. मणिपूरमध्ये आदिवासी महिलांवर अत्याचार झाले. मणिपूर पेटते आहे. अशावेळी पंतप्रधानांना मणिपूरमध्ये भेट देण्यासाठी वेळ नाही. मोठी जाहिरातबाजी करून उभारलेले राम मंदिर व नवीन संसद भवन यांच्या उद्घाटनासाठी देशाच्या महामहीम राष्ट्रपतींना बोलवले नाही. यावरून हे सरकार कोणत्या विचारांचे आहे, हे लक्षात घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारणाऱ्या विचारांचे सरकार सत्तेवर आहे. सरकारच्या घोषणा फक्त निवडणुकीपुरते आहेत. यांच्या कोणत्याही घोषणांना फसू नका. यांना बहीण लाडकी नसून सत्ता लाडकी असल्याची टीका त्यांनी केली. लकी जाधव म्हणाले, आदिवासींच्या विकासाच्या योजनेचा निधी हा लाडक्या बहिणीसाठी वापरला जात आहे. हे सरकार आपले सर्व अधिकार काढून घेत आहे, असे सांगितले. डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या, आदिवासी हे मूळ देशाचे मालक आहेत. स्त्रियांना मान देणारा पर्यावरणाचा रक्षण करणारा जीवनात जगण्यासाठी रोज संघर्ष करणारा आदिवासी बांधव आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article