दोषी आढळल्यास पंचांवरही कारवाई केली जाणार:कुस्तीगीर संघाच्या कार्याध्यक्षांचा इशारा, म्हणाले - कुस्तीगीर संघ नियमाने बांधलेला

2 hours ago 1
महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पंचांनी दिलेल्या निर्णयानंतर मोठा वाद झाल्याचे पाहायला मिळाले. पैलवान शिवराज राक्षे यांनी पंचांनी चुकीचा निर्णय दिल्याचा आरोप केला. संतापलेल्या शिवराजने थेट पंचांच्या छातीत लाथ घातली. कुस्तीगीर परिषदेने शिवराज राक्षेवर तीन वर्षांसाठी निलंबनाची कारवाई केली. या सर्व घडामोडींवर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांनी प्रतिक्रिया दिली. शिवराज राक्षेच्या कुटुंबियांनी जर आमच्याकडे पंचांच्या विरोधात तक्रार दिली तरी या संदर्भात समिती स्थापन करून पंचांवर देखील कारवाई केली जाईल, अशी माहिती भोंडवे यांनी दिली. संदीप भोंडवे यांनी डबल महाराष्ट्र चंद्रहार पाटील यांच्या विधानावरही भाष्य केले. संदीप भोंडवे म्हणाले की, काल पंचाना लाथ मारल्यानंतर आमचे पंच मॅटवरच आंदोलनाला बसले होते. शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्यावर कारवाई करून गुन्हे दाखल व्हावेत, अशी संपूर्ण पंचाची इच्छा होती. पंच मॅटवरून उठत नव्हते. त्या ठिकाणी रामदास तडस आले, त्यांनी सर्व पंचांशी आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. वाद विवाद होतच असतात. परंतु दोघांवर गुन्हे दाखल केले असते, तर त्यांना नोकरी मिळाली नसती. काही अडचणी आल्या असत्या. निकाल लागायला वेळ गेला असता. त्यामुळे आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही. आम्ही सर्वजण कुस्ती संघाचे पदाधिकारी, कुस्ती संघाचे अध्यक्ष यांनी सर्वांनी चर्चा करून या दोन्ही पैलवानांवरती तीन-तीन वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला. ...तर शंभर टक्के पंचांवर कारवाई केली जाईल पंचांचा निर्णय चुकीचा होता का? या प्रश्नावर उत्तर देताना संदीप भोंडवे म्हणाले, मी शिवराज, त्याची आईची आणि कुटूंबातील सर्वांची प्रतिक्रिया ऐकली. पंचांवर देखील कारवाई केली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. शिवराज आणि त्याच्या कुटुंबीयांना पंचाविरोधात आक्षेप असेल, तर त्यांनी कुस्तीगीर संघाकडे अर्ज करावा. अर्ज केल्यानंतर त्या व्हिडिओमध्ये साईड पंच किंवा मुख्य पंच असेल तर त्या सर्व गोष्टींची शहानिशा करावी लागेल. त्यानंतर एक कमिटी नेमली जाईल. त्यामध्ये जर पंच दोषी आढळले तर, शंभर टक्के पंचावर देखील कारवाई केली जाईल. चंद्रहार पाटील गरम डोक्याचा, तो आमचाच आहे शिवराज राक्षे याने पंचांना लाथ मारून चुकी केली, त्याऐवजी अशा पंचांना गोळ्या घातल्या पाहिजे, असे विधान डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी केले. याबाबत संदीप भोंडवे यांना विचारले असता, पैलवान गरम डोक्याचे असतात. चंद्रहार यांनी उद्वीग्नपणे गोळ्या घाला म्हटले पण, जे बोलणारे आहेत ते आमचेच आहेत. आज जरी ते आमच्यासोबत रागाने बोलत असले तरी ते उद्या आमच्यासोबत गोड बोलणार आहेत, त्यामुळं मी त्यावर काही बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली. चुकणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल संदीप भोंडवे म्हणाले की, कुस्तीगीर संघ नियमाने बांधलेला आहे. जागतिक कुस्तीचे नियम महाराष्ट्रातही लागू होतात. ज्या गोष्टी चुकीच्या आहेत, त्यांना पायबंद घालण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. पंच असो, कुस्तीगीर असो किंवा पदाधिकारी असो, जे चुकतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असेही त्यांनी सांगितले. आतापर्यंत महाराष्ट्र केसरी वादाविना झाली नाही, आरोप प्रत्यारोप होत आहेत. उद्या परत आम्ही सर्वजण एकत्रित दिसू.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article