Published on
:
28 Sep 2024, 7:16 pm
Updated on
:
28 Sep 2024, 7:16 pm
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करायचे असून उद्धव ठाकरे यांना स्वतः मुख्यमंत्री व्हायचे आहे तर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आधीच या खुर्चीवर दावा केला यासह इतरही अनेक जण इच्छुक आहेत. एकंदरीत महाविकास आघाडीत 'माझे कुटुंब माझा मुख्यमंत्री' अशी चढाओढ पहायला मिळत आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्री कोण हे महत्त्वाचे नाही, महायुतीचे सरकार येणे महत्त्वाचे आहे असा टोला मिसेस होम मिनिस्टर अमृता देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (दि.२८) लगावला.
दक्षिण पश्चिम मतदार संघातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या मेळाव्याच्या निमित्ताने त्या पावनभूमी परिसरात बोलत होत्या. शनिवारी त्यांनी विविध कार्यक्रमात हजेरी लावली. एकंदरीत देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी निवडणूकपूर्व अमृता फडणवीस मैदानात उतरल्याचे चित्र आहे.
दोन वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात अनेक कामे झाली आहेत. त्यामुळे महायुतीचे सरकार राज्यात पुन्हा एकदा येणार आहे. मुख्यमंत्री कोण हे सध्या महत्त्वाचे नाही, सरकार महत्त्वाचे आहे यावर त्यांनी भर दिला. दरम्यान राज्यात सध्या सुरू असलेल्या लाडकी बहीण योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. महिला आनंदी आहेत. या योजनेला विरोध करणारे सावत्र भाऊ आहेत, असा आरोप आहे त्यांनी या निमित्ताने केला.