Published on
:
06 Oct 2024, 2:02 pm
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा-
उत्तराखंड पर्यटन विकास महामंडळाच्या पुढाकाराने आणि आयआरसीटीसीच्या सहकार्याने बद्री केदार श्री कार्तिक स्वामी एक्सप्रेस ३ ऑक्टोबरला मुंबईहुन निघाली. मुंबईहून निघालेली ही गाडी उत्तराखंड राज्यात प्रवास करणार आहे. १० रात्री आणि ११ दिवस हा यात्रेचा कालावधी आहे. यामध्ये एकूण २७० प्रवासी असून हे प्रवासी महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील आहेत. दरम्यान, या माध्यमातून उत्तराखंड राज्यातील माहिती नसलेली स्थळे दाखवण्याचा प्रयत्न असल्याचे उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी म्हणाले.
श्री कार्तिक स्वामी एक्सप्रेसच्या माध्यमातून प्रवाशांना बद्रीनाथ, ऋषिकेश, केदारनाथ, श्री कार्तिक स्वामी मंदिर आदी भागांचे दर्शन करता येईल. प्रवाशांना सुलभ प्रवास करता यावा म्हणून एका डब्यात केवळ चार बर्थ आरक्षित केले आहेत. तसेच उत्तराखंडी खाद्यपदार्थासह इतरही लोकप्रिय व्यंजने प्रवाशांना खाता यावी यासाठी वातानुकूलित किचन गाडीमध्ये आहे. या एकूण प्रवासात स्थानिक रोजगाराला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने स्थानिक मार्गदर्शकांच्या सेवा विविध गंतव्यस्थानांवर वापरल्या जाणार आहेत.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी यावर आनंद व्यक्त केला असून विविध राज्यांमधून आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. त्यांनी विशेषत्वाने नमूद केले की, उत्तराखंड सरकार देशाच्या विविध भागांतील पर्यटकांना उत्तराखंडमधील विविध ठिकाणांचे दर्शन करण्यासाठी तत्पर आहे. तसेच श्री कार्तिक स्वामी मंदिर हळूहळू एक लोकप्रिय तीर्थक्षेत्र बनत आहे आणि आजूबाजूच्या गावांमध्ये पर्यटन सुविधा वाढवण्याचा सरकारचा विचार आहे. उत्तराखंडचे पर्यटन मंत्री सतपाल महाराज यांनी नमूद केले की, ही पर्यटन ट्रेन उत्तराखंडच्या पाककृती आणि संस्कृतीला तसेच तिथल्या कमी ज्ञात ठिकाणांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्याही राज्य सरकारचा देशातील अशा प्रकारचा पहिला उपक्रम आहे, असेही ते म्हणाले.