आशिष देशमुख
भारतातील गरिबांची संख्या गत दहा वर्षांत 10.8 टक्क्यांनी घटली आहे, असा अहवाल अर्थतज्ज्ञ सी. रंगराजन समितीने दिला आहे. मात्र, देशात तरुण, प्रौढ आणि महिला मजुरांची संख्या वाढत आहे. तसेच, लोकसंख्येच्या प्रमाणात नोकर्या उपलब्ध नसल्याने देशात अजूनही 32.7 टक्के लोक दारिद्य्ररेषेखाली आहेत, असा अहवाल जागतिक बँकेने दिला आहे.
जगभरातील सर्वच देश 17 ऑक्टोबर हा दिवस दारिद्य्रनिर्मूलन दिन म्हणून साजरा करतात, या निमित्ताने कोणत्या देशात किती लोक दारिद्य्ररेषेखाली आहेत, याचा अंदाज घेतला जातो.गेल्या काही वर्षात भारत सरकारने 25 लाख लोकांना दारिद्य्ररेषेच्या वर आणले असले, तरी भारतात गरिबांची संख्या जगातील गरिबांच्या तुलनेत एकतृतीयांश एवढी आहे, म्हणजे भारतात सर्वात गरीब लोक राहतात. भारतातील गरिबीचा टक्का हा 32.7 टक्के इतका आहे. तसेच, 68 टक्के लोकांची कमाई अजूनही दररोज दोन डॉलरपेक्षा जास्त नाही, असा अहवाल जागतिक बँकेने नुकताच प्रसिद्ध केला आहे. रोजगार आणि लोकसंख्येचे गुणोत्तर याचा मेळ भारतात बसत नसल्याचे या अहवालात म्हटले आहे.