Published on
:
28 Sep 2024, 10:48 am
Updated on
:
28 Sep 2024, 10:48 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर राज्यात पाहणी केली. यावेळी राज्यातील ११ राजकीय पक्षांशी चर्चा केली. त्यांच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा केली. त्य़ाचबरोबर राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, इतर अधिकारी यांच्याकडून तयारीचा आढावा घेतला, अशी माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी आज (दि. २८) पत्रकार परिषदेत दिली.
११ राजकीय पक्षांशी चर्चा- राजीव कुमार
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, "महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी आम्ही येथे आलो आहोत. आम्ही या दौऱ्यादरम्यान राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. आम्ही भागधारक, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि डीजीपी यांची भेट घेतली. आम्ही बसपा, आप, सीपीआय (एम), काँग्रेस, मनसे, सपा, शिवसेना (ठाकरे गट), शिवसेना अशा एकूण ११ पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली. त्यांनी निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यापूर्वी दिवाळी, देव दिवाळी आणि छठपूजा यासारख्या सणांचा विचार करावा, अशी सूचना केली आहे."
राज्यात २८८ विधानसभा मतदारसंघ आहेत. राज्यात ९.५९ कोटी मतदार आहेत. ८ लाख १८६ मतदान केंद्रे आहेत. तर महिला मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबरला संपणार आहे. त्यापूर्वी निवडणुकीची प्रक्रिया करावी लागणार आहे, असे त्यांनी सांगितले.
आगामी काळात राज्यात दिवाळी, दसरा या सारखे मोठे सणवार येत आहेत. त्यामुळे निवडणुकांची तारीख जाहीर करताना याचा विचार करण्यात यावा. सण, उत्सव लक्षात घेऊन निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्याची विनंती पक्ष नेत्यांनी केल्याचे त्यांनी सांगितले.
निवडणुकीत पैशांचा वारेमाप होणारा वापर रोखण्यासाठी उपाययोजना करण्य़ात यावी. मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास मनाई करण्यात यावी. आठवड्याच्या मधल्या काळात निवडणूक घेण्यात याव्यात. फेक न्यूज रोखण्यासाठी व्यवस्था करण्यात यावी. मतदान केंद्रावर सोयी-सुविधा देण्यात याव्य़ात. वृद्ध मतदारांना मतदान केंद्रात जाण्यासाठी व्यवस्था करण्य़ात यावी, अशा महत्त्वपूर्ण सुचना राजकीय पक्षांनी केल्याचे राजीव कुमार यांनी सांगितले.