महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाघोटाळा, 5 महिन्यांत 39 लाख मतदार कसे वाढले? राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

2 hours ago 2

लोकसभा विरोधी पक्षनेते, काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांची महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालावर दिल्लीत संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत राहुल गांधी, संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांनी थेट निवडणूक आयोगावर निशाणा साधला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा अभ्यास केला. आणि निवडणुकीत महाघोटाळा झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. निवडणूक आयोग सरकारचं गुलाम झालं आहे. महाराष्ट्र निवडणुकीत 39 लाख मतदार कुठून आले? हे मतदार आता बिहारला जातील. त्यातील काही दिल्ली निवडणुकीतही दिसले. ते आता बिहार आणि यूपीलाही जातील, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.

मतदार यादीत अनेक त्रुटी आहेत. 5 महिन्यांत 7 लाख मतदारांची नोंदणी झाली. निवडणुकीच्या आधी इतक्या मोठ्या संख्येत मतदारांची नोंदणी कशी झाली? असे अनेक प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केले. विधानसभा निवडणूक 2019 आणि लोकसभा निवडणूक 2024 या 5 वर्षांच्या कालावधीत 32 लाख मतदार वाढले. पण लोकसभा निवडणूक 2024 आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान 5 महिन्यांच्या काळात 39 लाख मतदार वाढले. हे मतदार कोण आहेत? दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्रात राज्यातील एकूण लोकसंख्येपेक्षा अधिक मतदार कसे? 9 कोटी 54 लाख लोकसंख्या असताना मतदार त्यापेक्षा जास्त आहेत. काही करून महाराष्ट्रात अचानक मतदार उभे केले गेले. वाढलेले मतदान फक्त भाजपलाच मिळाले आणि आमचे मतदान तेवढेच कसे? असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला.

राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरच संशय व्यक्त केला. आम्हाला मोठी तफावत आढळून आली आहे. निवडणक आयोगाकडे राज्यातील तीन मोठे पक्ष मतदार यादी मागत आहेत. आम्हाला महाराष्ट्रातील मतदारांची नावं आणि त्यांचे पत्ते असलेली मतदार यादी पाहिजे. आम्हाला लोकसभा निवडणुकीची मतदार यादी पाहिजे. नवे मतदार कोण आहेत हे जाणून घेण्यासाठी आम्हाला विधानसभा निवडणुकीतील मतदार यादी फोटोसह पाहिजे. अनेक मतदारांची नावं हटवण्यात आली आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

एकाच मतदान केंद्रावरील मतदार दुसऱ्या मतदान केंद्रावर फिरवण्यात आले. यातील बहुतेक मतदार दलित, मुस्लिम आणि आदिवासी आणि अल्पसंख्यांक समाजातील आहेत. आम्ही निवडणूक आयोगाकडे यासंबंधी सतत पाठपुरावा केला. पण कोणतेही उत्तर मिळालेले नाही. आयोगाने उत्तर दिलं नाही याचं कारण त्यात काहीतरी घोळ आहे आणि तो आयोगाला माहिती आहे. हा आरोप नाही तर याचे सर्व पुरावे दिलेत, असे राहुल गांधी म्हणाले. दरम्यान, निवडणूक आयुक्त निवडण्याची पद्धतही सरकारने बदलली, असे राहुल गांधी म्हणाले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article