मोठी बातमी समोर येत आहे, आता पुन्हा एकदा ईव्हीएमचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीनंतर विरोधकांकडून सातत्यानं ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी सुरुवातीपासूनच या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे अशी त्यांची मागणी आहे. आता या प्रकरणात त्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ते लवकरच ईव्हीएम आणि निवडणूक आयोगाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. बॅलेट कट्रोल आणि व्हीव्हीपॅट मशीन उलट -सुलट जोडून घोळ केल्याचा दावा आमदार जानकर यांनी केला आहे.
दरम्यान एवढंच नाही तर ते ईव्हीएमविरोधात मारकडवाडी ते शिवाजी पार्क असा पायी लाँग मार्च काढणार आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यासह काँग्रेस नेते आणि सामाजिक कार्यकर्ते या मार्चमध्ये सहभागी होणार आहेत. 19 फेब्रुवारी रोजी या मार्चला सुरुवात होणार असून, दररोज 15 किलोमीटर प्रवास करून 21 व्या दिवशी हा मोर्चा शिवाजी पार्कवर धडकणार आहे. त्यादिवशी शिवाजी पार्कवर राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सभा होणार आहे. या मोर्चामुळे आता पुन्हा एकदा सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
नेमकं काय म्हणाले उत्तम जानकर?
राहुल गांधींनी आणि सुप्रिया सुळेंनी ओरडून उपयोग नाही, इलेक्शन कमिशन कुणालाही दाद देत नाही. त्यामुळे आता हायकोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे. मतदान करताना वेळ का लागला? पहिले ट्रान्सप्लांट होतं आता काळी काच लावली आहे. अनेक सामाजिक कार्यकर्ते या विरोध मैदानात उतरले आहेत. काँग्रेसनं देखील एक समिती नेमली आहे. 18 मार्चला शिवाजी पार्क मैदानात एकत्र यायचं आहे. 20-25 वकिलांनी देखील हायकोर्टात जाऊन विनंती करायची आहे. 80 टक्के लोकं अनएज्युकेटेड आहेत त्यांना कळत नाही मतदान कुणाला दिलं. मी इलेक्शन कमिशनला वेळ दिला होता, आता 4 दिवस बाकी आहेत त्यानंतर आम्ही हायकोर्टात जाणार आहोत, असं जानकर यांनी म्हटलं आहे.