Published on
:
28 Sep 2024, 5:19 am
Updated on
:
28 Sep 2024, 5:19 am
मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावर चौकशी करण्यासाठी न्यायमूर्ती कैलास चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या चौकशी आयोगाने आपल्याला क्लीन चिट दिल्यानेच राज्य सरकारने हा अहवाल दडवून ठेवला, असा आरोप राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना केला. हा अहवाल सरकारने तातडीने जाहीर करावा, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.
चांदीवाल आयोगाचा अहवाल जाहीर करावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याच्या मुख्य सचिवांना कायदेशीर नोटीस पाठविली असल्याची माहितीही देशमुख यांनी दिली. देशमुख पुढे म्हणाले की, गृहमंत्री असताना मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी आपल्यावर 100 कोटींच्या वसुलीचा आरोप केला होता. या आरोपाची चौकशी करण्यात यावी, यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून सखोल चौकशी करून जनतेसमोर सत्य आणावे, असे सांगितले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती कैलास चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोगाची नेमणूक केली होती.
या आयोगाने या प्रकरणात अनेकांच्या साक्षी नोंदविल्या, कागदपत्रे तपासली आणि 11 महिने चौकशी केली. त्यानंतर 1 हजार 400 पानांचा अहवाल तयार करून तो राज्य सरकारला सादर केला. गेल्या 2 वर्षांपासून हा अहवाल दडवून ठेवण्यात आला आहे. या अहवालात मला क्लीन चिट दिली असल्याने सरकार तो सार्वजनिक करत नाही. चांदीवाल आयोगाचा अहवाल विधानसभेच्या पटलावर ठेवावा. यामुळे अहवालाचे फायंडिंग जनतेसमोर येईल. त्यातील सर्व गोष्टी जनेसमोर यायला हव्यात, अशी आपण एका पत्राद्वारे केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अनेक वेळा पत्र देऊनही त्यांनी दखल घेतलेली नाही. त्यामुळे राज्यपालांनासुद्धा पत्र लिहून चांदीवाल आयोगाचा अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी केली. मात्र, त्याची दखल घेतली गेली नाही.
2022 मध्ये हा अहवाल राज्य सरकारला सादर केल्यानंतर वर्तमानपत्रांत अनिल देशमुख यांना क्लीन चिट दिल्याच्या बातम्या आल्या होत्या. जे काही 1 हजार 400 पानांच्या अहवालात असेल, ते जनतेसमोर यायला हवे. माझ्या चौकशीचा अहवाल सादर करावा, यासाठी मी आग्रह करत आहे. त्यामध्ये माझ्याविरोधात काही असेल, तर तेसुद्धा समोर यायला हवे, असेही ते म्हणाले.