महाविकास आघाडीत जागावाटपावरून गृहकलह:उद्धव ठाकरे यांच्या वाट्याला केवळ 44 जागा, VBA अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा दावा

2 hours ago 1
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी जागावाटपाच्या मुद्यावरून विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीत मतभेद निर्माण झाल्याचा दावा केला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने दावा केलेल्या जागांचा आकडा 244 वर जात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या वाट्याला केवळ 44 जागा येत आहेत. यामुळे मविआत गृहकलह निर्माण झाला आहे, असे ते म्हणालेत. महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यानुसार, सत्ताधारी महायुती व विरोधी बाकावरील महाविकास आघाडीत जागावाटपावर गरमागरम चर्चा सुरू आहे. प्रत्येक पक्ष आपल्या खात्यात अधिकाधिक जागा खेचण्यासाठी प्रयत्नशील आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी जागावाटपाच्या मुद्यावरून महाविकास आघाडीत बेबनाव निर्माण झाल्याचा दावा केला आहे. विशेषतः त्यांनी यासंबंधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापुढे उभ्या राहिलेल्या पेचप्रसंगावर भाष्य केले आहे. ठाकरेंना केवळ 44 जागा मिळण्याची शक्यता प्रकाश आंबेडकर म्हणाले, शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीत 88 जागांच्या खाली एकही जागा घेणार नसल्याचा निश्चय केला आहे. काँग्रेस व शरद पवार गटाने मिळून 244 जागांवर दावा केला आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांच्या वाट्याला अवघ्या 44 जागा येत आहेत. त्यामुळे या प्रकरणी मोठा पेचप्रसंग निर्माण होऊन राजकारण होईल. सर्वात मोठी अडचण उद्धव ठाकरेंची होईल. त्यांना शिवसेना एकत्र असताना जेवढ्या जागा मिळाल्या होत्या, तेवढ्याही जागा यावेळी मिळतील का? असा प्रश्न आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात एक सर्व्हे करण्यात आला. त्यात शिवसेनेच्या 5.3 मतदानापैकी 2.7 टक्के मतदान एकनाथ शिंदे यांच्याकडे वळल्याचे समोर आले. काँग्रेसने त्यावर बोट ठेवले. जागावाटपात ठाकरे गटाला झुकते माप न मिळण्याचे हे एक प्रमुख कारण आहे. यावरून महाविकास आघाडीत संघर्ष निर्माण झाला आहे. आंबेडकर सोबत असते तर भाजपचा सफाया झाला असता दुसरीकडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकर यांचा मविआत मतभेद निर्माण झाल्याचा दावा फेटाळला आहे. महाविकास आघाडीत कोणतेही भांडण नाही. एवढेच नाही तर असे काही व्हायची कोणती सूतराम शक्यताही नाही. बाळासाहेब आंबेडकर यांनी लोकसभेचे निकाल पाहिले असते तर त्यांना आमची वज्रमूठ दिसली असती. आमची वज्रमूठ मजबूत होती. त्यामुळेच आम्ही महाराष्ट्रात नरेंद्र मोदींचा पराभव केला. बाळासाहेब आंबेडकर आमच्यासोबत असते तर नक्कीच ही लढाई अधिक रंगतदार झाली असती. या महाराष्ट्रातून भारतीय जनता पक्ष 100 टक्के नेस्तनाबूत झाला असता, असे ते म्हणाले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article