माजी मंत्री अनिल देशमुख यांनी न्यायमुर्ती चांदीवाल आयोगाच्या अहवालावरून मोठा आरोप केला आहे. Pudhari File Photo
Published on
:
28 Sep 2024, 8:57 am
Updated on
:
28 Sep 2024, 8:57 am
नागपूर: पुढारी वृत्तसेवा : न्यायमुर्ती चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोगाने मला क्लिन चिट दिल्याने माझ्यासंबंधी अहवाल दपडपण्यात येत आहे. आता राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री व मुख्य सचिव यांना नोटीस पाठवून सदर अहवाल हा सार्वजनिक करण्याची मागणी करणार असल्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
देशमुख म्हणाले की, मी गृहमंत्री असताना माझ्यावर जो आरोप झाला. त्याची चौकशी करण्याची मागणी तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली होती. यानंतर सरकारच्या वतीने न्यायमुर्ती कैलास चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग नेमण्यात आला. न्यायमुर्ती चांदीवाल यांनी सरकारकडे माझ्या चौकशीचा जो अहवाल दिला. तो सार्वजनिक करण्यासाठी मी अनेक वेळा विधानसभेत मागणी केली. या संदर्भात राज्यपाल, मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना अनेक वेळा पत्र सुध्दा लिहिले तरी सुध्दा तो अहवाल सार्वजनिक करण्यात आला नाही.
गृहमंत्री असताना मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमविर सिंग यांनी माझ्यावर १०० कोटी रुपये वसुलीचा आरोप केला. मी या आरोपाची तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहुन चौकशी करण्याची मागणी केली होती. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी. यासाठी मी गृहमंत्री पदाचा राजीनामा सुध्दा दिला. जवळपास ११ महिने या प्रकरणाची चौकशी झाली. यात अनेकांचे जबाब घेण्यात आले. संपूर्ण चौकशी केल्यानंतर न्यायमुर्ती चांदीवाल यांनी त्यांचा अहवाल सरकारला सादर केला. परंतु, अहवाल सादर केल्यानंतर काही दिवसांतच महाविकास आघाडीचे सरकार पडले.
१४०० पानांचा चौकशी अहवाल सार्वजनिक करावा, यासाठी मी सातत्याने मागणी करीत आहे. अनेक वेळा राज्यपाल, मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना पत्र लिहून हा अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी केली. अनेक वेळा विधानसभेत सुध्दा हा प्रश्न उपस्थित करुन सदर अहवाल हा विधानसभेच्या पटलावर ठेवण्याची मी मागणी केली, यावर त्यांनी भर दिला.