माल तोच पॅकिंग मात्र वेगवेगळे अशी राजकीय पक्षांची परिस्थिती:राजू शेट्टी यांची टिका, परिवर्तन महाशक्ती आघाडी साताऱ्यात 6 ठिकाणी लढणार

2 hours ago 1
स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार संघटना व कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांनी एकत्र येत परिवर्तन महाशक्ती आघाडी स्थापन केली असून राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या विरोधात विधानसभा निवडणुकीमध्ये रणशिंग फुंकले आहे. सर्वसामान्यांच्या विकासाचे प्रश्न घेऊन आणि शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव हे जिव्हाळ्याचे प्रश्न घेऊन सातारा जिल्ह्यात ही तिसरी आघाडी सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार उभे करणार आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी साताऱ्यात पत्रकार परिषदेत दिली आहे. ​​पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्रातील २२५ घराणी आणि त्या घराण्यातील सदस्य आलटून- पालटून सातत्याने राज्याच्या सत्तेत येत राहतात. या महायुती आणि महाविकास आघाडी शासनामध्ये "माल तोच पॅकिंग मात्र वेगवेगळे.." अशी परिस्थिती आहे. या दोन्ही आघाड्यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे. सर्वसामान्य जनतेला सक्षम तिसरा पर्याय देण्याकरता चळवळीतले आम्ही नेते वामनराव चटप, शंकरराव धोंडगे, संभाजीराजे छत्रपती, प्रहार संघटनेचे बच्चू कडू आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना एकत्र आली असून त्यांच्या कोअर कमिटीची बैठक गुरुवारी पुणे येथे होत आहे. या बैठकीत महाराष्ट्रात ज्या ठिकाणी सक्षम आणि स्वच्छ चेहऱ्याचा उमेदवार मिळेल अशा जागा आपण तिसरी आघाडी म्हणून लढवणार असल्याचे सूतोवाच राजू शेट्टी यांनी केले. सातारा जिल्ह्यामध्ये कराड दक्षिण, कराड उत्तर, सातारा, माण, कोरेगाव व वाई या सहा विधानसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटना व कोअर कमिटी चर्चा करून उमेदवार देणार आहे. हे उमेदवार सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न घेऊन जनतेच्या समोर जाणार आहोत, असे सांगून " महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्यांचे थडगे बांधून विकास करणार आहात का?" असा स्पष्ट सवाल राजू शेट्टी यांनी केला. महाविकास आघाडीने भूमी अधिग्रहण अथवा एफआरपी या संदर्भात चुकीचे निर्णय घेतले तसेच महायुतीसुद्धा 'लाडकी बहीण योजने'च्या माध्यमातून लाखो रुपयांची उधळपट्टी करत आहे. दोन्ही आघाड्यांमध्ये जनतेशी काहीही घेणे- देणे नसलेले प्रतिनिधी आहेत. एकीकडे पैशाची लयलूट सुरू असताना दुसरीकडे ३३०० कोटी रुपये मुलांच्या शिष्यवृत्तीचे प्रलंबित आहेत, त्यामुळे असले सरकार काय कामाचे? असा प्रश्नही राजू शेट्टी यांनी विचारला. परिवर्तन महाशक्ती आघाडी राज्यात शेती, उत्पादन, शिक्षण व्यवस्था तसेच राजकीय व्यवस्था यांच्या बदलामध्ये निश्चित क्रांती घडवेल, असे सक्षम चेहरे आम्ही निवडणुकीच्या मैदानात उतरवत आहोत. त्यामुळे जनता ही आम्हालाच निवडून देईल, असा विश्वासही राजू शेट्टी यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, २५ ऑक्टोबर रोजी २३ वी ऊस परिषद भरवली जाणार असून ऊस दराच्या संदर्भात या परिषदेत चर्चा होईल. गतवर्षी तुटलेल्या ऊसाला पहिली उचल दोनशे रुपये व यंदाच्या उसाला किती दर घ्यायचा? हे ठरवले जाणार आहे. सातारा जिल्ह्यातील कारखानदारीचे साखर उतारे चांगले असताना कारखाने ३५०० रुपये पेक्षा जास्त दर देऊ शकत नाही, हाच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा लढा आहे. कारखान्याने जास्तीत जास्त दर द्यावा आणि ते देणे शक्य आहे. असे ठामपणे राजू शेट्टी यांनी सांगितले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article