मी महाराष्ट्र बोलतोय:मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार विधेयक मंजुरीसाठी सलग 21 तास विधानसभेत चर्चेच्या फैरी

2 hours ago 1
निवडणुका घोषित झाल्या की प्रचारसभा, आरोप-प्रत्यारोप, शक्तिप्रदर्शन अशी राजकीय रणधुमाळी अपरिहार्य ठरतेच. मात्र, विधिमंडळ सभागृहात कोणत्याही मुद््द्यावरून फक्त गोंधळच होतो, कामकाजाचा वेळ वाया जातो. विनाकारण घोषणाबाजी केली जाते. महत्त्वाच्या प्रश्नाला बगल देऊन कामकाज ठप्प केले जाते, असे मानणाऱ्या वर्गाला उशिरापर्यंत चाललेल्या सभागृह कामकाजाच्या अनेक आठवणी मला सांगायलाच हव्यात. एकूण सरासरी कामकाजापेक्षा बऱ्याचदा जास्त कामकाज होत असते आणि त्याचा लेखाजोखा विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी जनताजनार्दनासमोर सादर करत असतात... त्यातील एक ऐतिहासिक आठवण अशी ... मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा झाला तेव्हाचा हा प्रसंग. विद्यापीठाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे असा ठराव जनसंघ संमिलित ‘पुलोद' सरकारने १९७८ मध्येच संमत केला होता. मात्र त्यानुसार विधेयक-कायदा तयार होऊन तो संमत होण्यासाठी २१ एप्रिल १९९४ पर्यंत वाट बघावी लागली. सभागृहाची बैठक २१ एप्रिल १९९४ रोजी दुपारी १२ वाजता सुरू झाली. त्यात नामविस्ताराचे विधेयक विधानसभेत चर्चेला घेण्यात आले. या विधेयकावर सुरू झालेली चर्चा मध्यरात्र उलटून गेली तरी दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजून ५ मिनिटांपर्यंत सुरू होती. सन्माननीय सदस्य आणि विधानमंडळाचे अधिकारी, कर्मचारी जे रात्रभर सभागृह कामकाजासाठी सभागृहात उपस्थित होते ते आमदारांसमवेतच आमदार निवासमध्ये गेले आणि तासाभरात तयार होऊन पुन्हा विधानमंडळात आले. लगेच २२ एप्रिल १९९४ चे कामकाज सकाळी ११ वाजता सुरूही झाले. या विधेयकावर दोन्ही बाजूच्या सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील एकूण २१ सदस्यांनी आपले विचार मांडले. १९७८ मध्ये शरद पवार हे ‘पुलोद' सरकारचे मुख्यमंत्री होते. त्यांनीच पुन्हा मुख्यमंत्री झाल्यावर या नामविस्ताराबाबत १४ जानेवारी १९९४ रोजी घोषणा केली. अध्यादेशदेखील काढण्यात आला, जो १५ मार्च १९९४ रोजी सुरू झालेल्या अधिवेशनात शालेय शिक्षण मंत्री सलीम झकेरिया यांनी सभागृहाच्या पटलावर ठेवला. २१ एप्रिल १९९४ रोजी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री प्रभाकर धारकर यांनी या नामविस्तार विधेयकावरील चर्चेस प्रारंभ केला. दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजून ५ पर्यंत सुरू असलेल्या चर्चेत एकूण २१ सदस्यांनी सहभाग घेतला. ते सदस्य म्हणजे ॲड. लीलाधर डाके, प्रभाकर धारकर (उच्च व तंत्रशिक्षण मंत्री), गोपीनाथ मुंडे, निहाल अहमद, केशवराव धोंडगे, शंकरराव जगताप, जयप्रकाश मुंदडा, के. एस. मलाबादे, हरीश मोरे, साबीर शेख, मेताजी राजगडकर, परशराम टावरे, लक्ष्मणराव ढोबळे, दत्ताजी नलावडे, आनंदराव देवकाते, हशू अडवाणी, मधुकर सरपोतदार, रामदास आठवले (समाजकल्याण मंत्री), हेमकृष्ण कापगते, चंद्रकांत खैरे, ईश्वर जाधव. आता सांगा सभागृहात फक्त गोंधळच होतो म्हणून बोटे मोडणाऱ्यांना सभागृहाच्या कार्यवृत्तातील हे सुवर्णक्षण का दिसत नाहीत ...?

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article