मुंबई विद्यापीठावर ठाकरे गटाचा भगवा:​​​​​​​सिनेट निवडणुकीत 10 पैकी 10 जागांवर विजय, ABVP ला केवळ 706 मते, संजय राऊत यांचा हल्लाबोल

2 hours ago 1
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सर्वच्या सर्व 10 जिंकत भाजपच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा (अभाविप) पार धु्व्वा उडवला. खासदार संजय राऊत यांनी शनिवारी या प्रकरणी पत्रकारांशी संवाद साधताना भाजपवर सडकून टीका केली. तसेच या निवडणुकीमुळे जनतेचा कल काय आहे? हे स्पष्ट झाल्याचाही दावा केला. प्रस्तुत निवडणुकीत आम्ही जवळपास 92 हजार मते नोंदवली. याऊलट अभाविपला केवळ 706 मते मिळाली, असेही ते यावेळी म्हणाले. आदित्य ठाकरे यांनीही या प्रकरणी इथूनच निवडणुकीच्या विजयाचा सिलसिला सुरू होतो, असे सूचक ट्विट केले आहे. संजय राऊत म्हणाले की, भाजपने गत 2 वर्षांत अनेकदा निवडणूक टाळण्याचा प्रयत्न केला. शेवटी हायकोर्टाने दणका झाला आणि त्यानंतर काल मुंबई विद्यापीठाच्या सिनेटची निवडणूक झाली. त्यात 10 पैकी 10 जागा जिंकून या मुंबईतील तरुण वर्ग व सुशिक्षित पदवीधर हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते युवासेने प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मागे उभा असल्याचे स्पष्ट झाले. यापूर्वी पदवीधर मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीतही आमचा विजय झाला होता. आता सिनेटमध्येही झाला. त्यात अनेक पदवीधर लाडक्या बहिणीही आहेत. अभाविपच्या उमेदवारांना मिळून 706 मते संजय राऊत म्हणाले, प्रस्तुत निवडणुकीत आमच्या 10 पैकी 9 उमेदवारांनी विजयासाठी आवश्यक असलेल्या कोट्याहून जास्त मतदान घेतले. आम्ही जवळपास 92 हजार मते नोंदवली. आमच्या शेवटच्या उमेदवारानेही 865 मते घेतली. तर दुसरीकडे, भाजपच्या अभाविपच्या सर्व उमेदवारांना मिळून केवळ 706 मते मिळाली. अशा प्रकारे मुंबई विद्यापीठावर शिवसेना ठाकरे गटाचा भगवा फडकला आहे. मतदान बॅलेटपेपरवर झाल्याने मिंध्यांचे काहीही चालले नाही अभाविप व मिंधेंची शिवसेना यांना ही निवडणूक टाळता आली नाही आणि जिंकताही आली नाही. याचे कारण असे की, हा सुशिक्षित मतदार विकला जात नाही. इथे मते विकली जाण्याची कोणतीही शक्यता नव्हती. त्यामुळे मिंध्यांचे काहीही चालले नाही. दुसरे म्हणजे हे मतदान ईव्हीएमवर नव्हे तर बॅलेट पेपरवर होते. त्यामुळे कुणाला त्यात गडबडही करता आलीनाही. परिणामी, मुंबईतील तरुणांनी मोठ्या प्रमाणात शिवसेना ठाकरे गटाला मतदान केले. ही लोकांची मानसिकता व त्यांचा कल दाखवणारी निवडणूक ठरली, असेही संजय राऊत यावेळी बोलताना म्हणाले. निवडणुकीच्या विजयाचा सिलसिला सुरू आदित्य ठाकरे यांनीही या निवडणुकीतील विजयावर आनंद व्यक्त केला आहे. ते आपल्या एका पोस्टमध्ये म्हणाले, 10 पैकी 10 पुन्हा एकदा! ज्यांनी आम्हाला मतदान केले, त्या सर्वांचे आणि शिवसेना (ठाकरे गट) युवासेना सहकाऱ्यांचे, तुमच्या विश्वासासाठी, पाठिंब्याबद्दल, प्रयत्नांसाठी आणि आशीर्वादाबद्दल मनःपूर्वक आभार. मुंबई विद्यापीठ पदवीधर सिनेट निवडणुकीत आम्ही आमची कामगिरी केवळ पुनरावृत्ती केली नाही तर सुधारली आहे. 100 टक्के स्ट्राइक रेट. इथूनच निवडणुकीच्या विजयाचा सिलसिला सुरू होतो. दरम्यान, ठाकरे गटाचे विजयी उमेदवार मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article