राज ठाकरेंकडून संगमनेरकरांचा अपमान:सुजय विखे पाटलांचा आरोप; बाळासाहेब थोरातांच्या 'हसऱ्या' चेहऱ्यामागे जनता रडत असल्याचा टोला
2 hours ago
1
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संगमनेरच्या गोरगरीब जनतेचा अपमान केल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केला आहे. राज ठाकरे यांना संगमनेर तालुका माहिती आहे की नाही हे मला माहिती नाही. पण त्यांनी तेथील गोरगरीब जनतेचा अपमान केला आहे. 7 टर्म आमदार राहिलेल्या हसऱ्या चेहऱ्यामागे (बाळासाहेब थोरात) जनता किती रडत होती हे त्यांना कळेल व तेथील परिवर्तनाचे उत्तरही मिळेल, असे ते म्हणालेत. राज ठाकरे यांनी शु्क्रवारी मनसेच्या मेळाव्यात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर विधानसभा मतदारसंघात झालेल्या धक्कादायक पराभवावर संशय व्यक्त केला होता. बाळासाहेब थोरात 7 वेळा आमदार झाले. यंदा त्यांची 8 वी टर्म होती. सातवेळा 70 हजार मतांनी निवडून यायचे. पण या निवडणुकीत त्यांचा 10 हजार मतांनी पराभव होतो. चार ते पाच जागा येतील की नाही असे सर्वांना वाटत असताना अजित पवार यांच्या 42 जागा आल्या. यावर कुणाचा तरी विश्वास बसेल का? असे ते म्हणाले होते. राज ठाकरेंना संगमनेर तालुका माहितीही नसेल सुजय विखे पाटील यांनी त्यांच्या या विधानावर हरकत नोंदवत त्यांच्यावर तिखट हल्ला चढवला. राज ठाकरे यांनी संगमनेर तालुक्यात आले पाहिजे. पण संगमनेर तालुका कुठे आहे? हे त्यांना माहिती आहे की नाही याविषयी मला माहिती नाही. येथील लोकांच्या वेदना काय आहेत? भावना काय आहेत? हे ज्या दिवशी राज ठाकरे संगमनेरमध्ये येऊन सामान्य माणसांत मिसळतील तेव्हा त्यांच्या लक्षात येईल की परिवर्तन का झाले. राज ठाकरे यांचे विधान संगमनेरच्या गोरगरीब जनतेचा अपमान असल्याचे माझे स्पष्ट मत आहे. माणूस जेव्हा आपल्या हक्कांसाठी पेटून उठतो, तेव्हा परिवर्तन होते. हे परिवर्तन तालुक्याच्या जनतेने केले आहे. हे कुठल्या ईव्हीएमने केले नाही. त्यामुळे माझी राज ठाकरे यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांच्या पुढच्या दौऱ्याची सुरुवात संगमनेरपासून करावी. तेव्हा त्यांना संगमनेरच्या 7 टर्म आमदार राहिलेल्या हसऱ्या चेहऱ्यामागे जनता किती रडत होती हे त्यांना कळेल आणि परिवर्तनाचे उत्तरही मिळेल. मी स्वतः राज ठाकरे यांचा फार मोठा फॅन आहे. पण बाळासाहेब थोरात यांच्या संदर्भात त्यांनी केलेल्या विधानाचे मी समर्थन करू शकत नाही. येथे संघटनेने खूप मोठे काम केले आहे. त्यामुळे परिवर्तन झाले. पण त्यांची भूमिका काय असावी व काय नाही हे सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे, असे सुजय विखे पाटील यांनी यांनी म्हटले आहे. विधानसभा निवडणुकीवर संशय व्यक्त उल्लेखनीय बाब म्हणजे राज ठाकरे यांनी मनसेच्या मेळाव्यात बोलताना विधानसभा निवडणुकीचा निकाल संशयास्पद असल्याचा दावा केला होता. लोकांनी मनसेला मतदान केले, पण ते आपल्यापर्यंत पोहोचले नाही. ते कुठेतरी गायब झाले. अशा प्रकारच्या निवडणुका लढवायच्या असतील तर निवडणुका न घेतलेल्याच बऱ्या. अर्थात, ही पण गोष्ट निघून जाईल. कुणीही कोणत्या गोष्टीचा अमरपट्टा घेऊन आले नाही. विधानसभा निवडणुकीनंतर संपूर्ण राज्यभरात सन्नाटा पसरला होता. याविषयी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका नेत्यानेही माझ्याकडे ही गोष्ट बोलून दाखवली होती, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानामुळे राज्यात एकच खळबळ माजली आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)