बैठकीत बोलताना खा. श्री. छ. उदयनराजे भोसले. समोर उपस्थित जनसमुदाय.Pudhari Photo
Published on
:
18 Oct 2024, 12:58 am
Updated on
:
18 Oct 2024, 12:58 am
सातारा : राज्यात सर्वात ज्येष्ठ असणार्या शरद पवारांनीच सातारा जिल्ह्याला विकासापासून वंचित ठेवले. अनेक वर्षे सत्तास्थाने भोगूनही जनतेकडे कायम दुर्लक्ष केले, अशा शब्दांत खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी हल्ला चढवला.
सातारा विकास आघाडी तसेच नगर विकास आघाडीचे नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य तसेच आजी-माजी पदाधिकार्यांची बैठक हॉटेल लेक ह्यू येथे पार पडली. यावेळी आ. शिवेंद्रराजे भोसले, माजी केंद्रीय मंत्री अजयकुमार जमवाल, अॅड. भारत पाटील, वसंतराव मानकुमरे, सुनील काटकर, सौरभ शिंदे, ज्ञानदेव रांजणे, अशोक मोने, अविनाश कदम, रंजना रावत, निशांत पाटील, गीतांजली कदम तसेच नगरसेवक, सातारा तसेच जावली तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
खा. उदयनराजे भोसले म्हणाले, राजकारण, समाजकारणात शरद पवार सर्वांत ज्येष्ठ आहेत. इतकी वर्षे मुख्यमंत्री असताना आणि सत्तास्थाने ताब्यात असताना कामे का झाली नाहीत? विकासापासून लोकांना वंचित ठेवणे, दुर्लक्षित ठेवायचे, त्यांना सक्षम होऊ दिले नाही. जनता अवलंबून राहिल्याने ते तसे वागत गेले. शरद पवार सत्तेत असताना मराठा आरक्षणाचा प्रश्न का मार्गी लागला नाही? छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्वधर्मसमभावाचा विचार कुठे गेला? निवडणुकीपुरतं त्यांचं नाव घेणार का? सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्याच काम का केलं नाही? असाही सवाल खा. उदयनराजेंनी केला.
खा. उदयनराजे म्हणाले, राज्यात अनेक वर्षे काँग्रेसचे सरकार होते. या पक्षाचे आमदार, खासदार, मंत्री यायचे आणि आश्वासन द्यायचे. माण-खटाव-खंडाळा हा भाग दुष्काळी असताना दगडाला शेंदूर फासला तरी लोक निवडून देतात, ही त्यांची भाषा होती. लोकप्रतिनिधी कार्यरत असतात त्यावेळी विकास घडतो. कृष्णा खोरे विकास महामंडळाची योजना गोपीनाथ मुंडे यांच्याकडे घेऊन गेलो. सातारा, जावली या भागातही पाण्याची वानवा होती. या योजनेमुळे जनतेचं कोटकल्याण झालं. आ. शिवेंद्रराजे भेासले यांच्याशिवाय सातारा विधानसभा मतदारसंघात दुसरं कोण कार्यरत आहे?आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी लोकसभेवेळी हेवेदावे बाजूला ठेवून पक्षासाठी एकत्र आलो आणि नेतृत्वाला दिलेला शब्द पाळला. स्थानिक पातळीवरील हेवेदावे, मतभेद बाजूला ठेवून एकत्र काम करूया, असे आवाहन केले.
तुमची इच्छा असेल, तर मी राजीनामा देतो : खा. उदयनराजे
नगरसेवक अविनाश कदम यांनी ‘खासदार शिवेंद्रराजे’ असा उल्लेख करत बाबाराजेंचं नाव तोंडात बसलंय, अशी कबुली देत दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी खा. उदयनराजेंनी मिश्कीली केली. ते म्हणाले, कधी कधी मला तुमचं नाव काय विचारलं की मी स्वत: म्हणतो.. माझं नाव शिवेंद्रराजे.. शिवेंद्रराजे आणि उदयनराजे वेगळे नाहीत. तुमची इच्छा असेल तर मी राजीनामा देतो. त्यांनी खासदार व्हावं मी आमदार होतो असे उदयनराजेंनी सांगताच आ. शिवेंद्रराजे म्हणाले, तुमचं जोरात काम आहे. आम्ही छोटे आहोत.. छोट्यातच बरं आहे.. यावर उदयनराजे म्हणाले, छोटं -मोठं काय नसतं. वेळ पडल्यावर कळतं. छोटं कोण आणि मोठे कोण.. उदयनराजेंच्या या मिश्किलीने हशा पिकला.