सोमवारी भल्या पहाटे ४ वाजता झालेल्या दुहेरी हत्याकांडाने शिर्डी हादरले. तासाभरात ३ वेगवेगळ्या ठिकाणी तिघांवर प्राणघातक हल्ले झाले. त्यात शिर्डीच्या साई संस्थानचे कर्मचारी सुभाष साहेबराव घोडे (४०, रा. करडोबानगर, विमानतळ रोड, शिर्डी) तर नितीन कृष्णा शेजूळ (४०, रा. शिर्डी-साकुरी शीवरस्ता, शिर्डी) यांचा समावेश आहे. या दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर कृष्णा बाबुराव देहरकर (६८, श्रीकृष्णनगर, विमानतळ रोड) हे गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर लोणी येथील प्रवरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पहिली घटना पाेलिस ठाण्यापासून अवघ्या सव्वा किमी परिसरात घडली. बाईकवर आलेल्या दोघांनी साकुरी शिव परिसरात आठ मिनिटे ठाण मांडले आणि चार मिनिटांमध्ये शेजूळ यांना निर्दयीपणे संपवले. सुभाष घोडे हे साईमंदिरातील कर्मचारी घरुन ड्युटीवर जाण्यासाठी निघाले होते. तर नितीन शेजुळ हे सुरक्षा कर्मचारी ड्यूटी संपवून घरी निघाले होते. तर कृष्णा देहरकर हे मुलाला सोडून घरी निघाले होते. दुचारीवर असलेल्या दोन्ही सराईत गुन्हेगारांनी चोरीच्या उद्देशाने तिघांना वेगवेगळ्या वेळेत अडवून त्यांच्याकडील रक्कम हिसकावून घेतली. प्रत्येकावर त्यांनी ५ ते ७ वार केले आहेत. यात दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. तर एक ग्रामस्थ गंभीर जखमी आहे. ही हल्ल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. फरार आरोपीला पकडण्यासाठी पथक तैनात पोलिसांनी फरार आरोपीला अटक करण्यासाठी विविध पथके तैनात करून शोधमोहीम सुरू केली. पोलिसांनी ही घटना गांभीर्याने न घेतल्याने मृतांचे नातेवाईक व नागरिकांनी संताप व्यक्त केला. या हत्याकांडामुळे शिर्डीत तणावपूर्ण शांतता आहे.
पहिली घटना : साकुरी शीव चौकात पहाटे ४.१४ मिनिटांनी नितीन शेजूळ यांचा खून करण्यात आला.
दुसरी घटना : विमानतळ रोडवरील करडोबानगर परिसरात सुभाष घोडे यांच्यावर चाकूहल्ला करण्यात आला.
तिसरी घटना : करडोबानगरपासून ५०० मीटर अंतरावरील श्रीकृष्णनगरमध्ये कृष्णा देहरकर यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला.
मोफत अन्नछत्रामुळे शिर्डीत गुन्हेगारीत वाढ- सुजय विखे मोफत अन्नछत्रामुळे शिर्डीत गुन्हेगारी वाढत आहे. सोमवारी पहाटेची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. खरे तर अशी घटना आधी कधी घडलेली नाही. मोफत अन्नछत्र, मोफत शिर्डी करून ठेवलीय. त्यामुळे गुन्हेगारी वाढली आहे. आम्ही जे बोललो होतो ते कोणत्या उद्देशाने बोललो होतो ते महाराष्ट्राला कळेल. हे प्लॅन मर्डर वाटत नाहीत. नशेतील रँडम मर्डर आहेत, असे सुजय विखे पाटील म्हणाले.
एका संशयिताला पकडले, दुसरा फरार; त्यांच्यावर ८ गुन्हे दाखल खून प्रकरणातील एका संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले, तर दुसरा आराेपी फरार आहे. हे दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. ते एमडी ड्रग्ज सेवन करत होते. त्यांनी नशेतच दोघांचा खून केल्याचे सूत्रांनी सांगितले. ताब्यात घेतलेल्या आरोपींवर ३, तर फरार असलेल्या आरोपीवर ५ गुन्हे दाखल आहेत. हाणामाऱ्या, रस्ता अडवून लूट करणे, दरोडा टाकणे असे गुन्हे आहेत.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)