समाज संघटीत करण्यासाठी सामुदायिक प्रार्थना महत्त्वाची- रायजीप्रभू शेलोटकर:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त सामुदायिक ध्यानावर चिंतन

2 hours ago 1
भारत देशावर परकीयांची अनेक आक्रमणे झाली तसेच दीडशे वर्षे इंग्रजांनी सुद्धा राज्य केले. इंग्रजांच्या वेळेस जनतेला संघटीत करणे कठिण होते. त्यामुळे लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरुप देऊन जनतेला संघटीत करण्याचा प्रयत्न केला. परंतु, गणेशोत्सव केवळ दहा दिवस असल्यामुळे जनतेला केवळ दहा दिवसात संघटीत करुन इंग्रजी सत्तेविरूद्ध चिड निर्माण करणे कठिण होते. ही बाब राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी हेरली. कायम स्वरुपी जनतेला संघटीत करण्यासाठी त्यांनी सामुदायिक प्रार्थना निर्माण केली, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवातील सामुदायिक प्रार्थनेवरील चिंतनात रायजीप्रभू शेलोटकर यांनी केले. सामुदायिक प्रार्थनेवर चिंतन करताना ते पुढे म्हणाले, सामुदायिक प्रार्थनेचे तीन टप्पे असून, एक सामुदायिक प्रार्थना का निर्माण झाली, दोन सामुदायिक प्रार्थना का करावी, तीन सामुदायिक प्रार्थनेची फलश्रृती काय आहे? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मानवतावादी संत होते. सर्वधर्मपंथापेक्षा नागरिकांमध्ये मानवता निर्माण झाली पाहिजे, हाच त्यांचा प्रयत्न होता. सामुदायिक प्रार्थनेमुळे स्थितप्रज्ञता प्राप्त होत असून, त्यामुळे शत्रुत्व कमी होते. या भवसागरातून तरुण जाण्यासाठी सामुदायिक प्रार्थनेची गरज आहे, असे मत रायजीप्रभू शेलोटकर यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंतांनी निर्माण केलेली सामुदायिक प्रार्थना ही आदर्श जीवन प्रणाली असून, सर्व समाज व कुटुंब स्वर्ग समान करण्याची मागणी या प्रार्थनेतून करण्यात आली आहे. जनसेवा हीच ईश्वर सेवा हे सूत्र या सामुदायिक प्रार्थनेत असून, त्यामधून प्रत्येकाने स्वत:ला शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे आवाहन सामुदायिक प्रार्थनेवर चिंतन करताना रायजीप्रभू शेलोटकर यांनी केले. या प्रसंगी गुरूदेवभक्त उपस्थित होते. महिला संमेलनाला राहिल यांची उपस्थिती ः गुरूवारी दुपारी बारा वाजता पुष्पा बोंडे यांच्या अध्यक्षतेखाली महिला संमेलन होणार आहे. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून गुरूदेवनगरच्या सरपंच वैशाली धुमोणे, तिवसा पंचासत समितीच्या सभापती कल्पना दिवे, डॉ. लक्ष्मी जवंजाळ, डॉ. वसुंधरा बोंडे, डॉ. नयना कडू, गौरी देशमुख, संगीता शिंदे, माधुरी ढवळे उपस्थित राहणार आहेत. असे आहेत आजचे कार्यक्रम ः पुण्यतिथी महोत्सवादरम्यान गुरुवारी १७ ऑक्टोबरला पहाटे साडे पाच वाजता सामुदायिक ध्यानावर विलास साबळे हे चिंतन करतील. सकाळी सात वाजता योगासन व प्राणायाम, आठ वाजता निळकंठ हळदे यांचे ग्रामगीता प्रवचन, साडे अकरा वाजता धनश्री खंडारे यांची अभंग वाणी, दुपारी बारा वाजता महिला संमेलन, सायंकाळी सहा वाजता सामुदायिक प्रार्थनेवर पुष्पा बोंडे यांचे चिंतन, रात्री सात वाजता क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला भजन मंडळाचे खंजिरी भजन, आठ वाजता ज्योती धनाडे यांचे कीर्तन, साडे नऊ वाजता नारायणदास पडोळे यांचे कीर्तन होईल.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article