अकोला (Akola) :- बांगलादेशी नागरिक घुसखोरीच्या मुद्यावरुन भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गुरुवारी रामदासपेठ पोलिस ठाण्यात १६ जणांची यादी पुराव्यासहित सादर केली. जिल्ह्यात विविध भागात वास्तव्य करणाऱ्या ८० जणांनी गैरमार्गाने जन्म दाखला (Birth certificate) मिळवून भारताचे नागरिकत्व मिळविल्याचा दावा सोमय्या यांनी यावेळी केला. याप्रकरणी किरीट सोमय्या यांचे बयान नोंदविण्यात आले.
शहर पोलिस उपाधीक्षकांसोबत केली चर्चा
दरम्यान, नायब तहसीलदार यांच्या तक्रारीवरून बनावट जन्म दाखले सादर करणाऱ्या १३ जणांविरोधात रामदासपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करुन तीन जणांना अटक केली आहे. जन्म व मृत्यू नोंदणी कायद्यातील सुधारणेनंतर अकोला जिल्ह्यात उशिरा जन्म प्रमाणपत्रासाठी प्राप्त झालेल्या अर्जावर भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या यांनी आक्षेप घेतला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर जन्म व जात प्रमाणपत्रासाठी प्राप्त झालेल्या अर्जातील नावे बांग्लादेशी व्यक्तींची असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.
दरम्यान, याप्रकरणी सोमय्या यांनी तक्रार दिली असल्यामुळे बयान नोंदविण्यासाठी ते रामदासपेठ पोलिस ठाण्यात हजर झाले होते. यावेळी त्यांनी १६ जणांची यादी पुराव्यासहित शहर पोलिस उपअधीक्षक सतीश कुलकर्णी, रामदासपेठचे पोलिस निरीक्षक मनोज बहुरे यांच्याकडे सादर केली. याप्रकरणी लवकरच फॉरेन्सिक ऑडिटर नेमण्याचा अधिकार पोलिसांना मिळणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.
भाजप नेते किरीट सोमय्यांनी दिले पुरावे
अकोला तहसीलच्या नायब तहसीलदारस्वप्नाली काळे यांनी जन्मतारखेत खाडाखोड करुन प्रमाणपत्र मिळविणाऱ्या १२ जणांविरोधात रामदासपेठ पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. याप्रकरणी पोलिसांनी बीएनएस ३१८ (४), ३३६ (२), ३३७, ३३६ (३), ३४०(२), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला. तसेच मेहबूब खान नाजूल्ला खान, मोहम्मद जुबेर मो. युनूस, अब्दुल जुनेद पटेल अब्दुल बहार पटेल यांना अटक केली. १३ व्या आरोपीचे नाव हारप पोलिस तपासात निष्पन्न झाल्याची माहिती आहे.
अधिकारी-कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई!
या प्रकरणात सामील असलेल्या तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सुद्धा कारवाई होणार असा, इशारा भाजप नेते सोमय्या यांनी दिला. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शाळेतील नोंदी तपासण्याचे काम सुरू झाले आहे. तहसीलदारांच्या संमतीशिवाय बनावट दाखले तयार होऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांना पाठीशी घालणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कारवाई होणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य काम न केल्यास त्यांनाही सोडणार नाही, असा इशारा सोमय्या यांनी दिला.