नागपूर(Nagpur) :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (ST) येथे कार्यरत ४० वर्षांवरील कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी व्हावी, याकरिता महामंडळातर्फे धर्मवीर आनंद दिघे आरोग्य तपासणी योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेत ४० वर्षांवरील कर्मचाऱ्यांची दोन आर्थिक वर्षांत एक वेळा ११ प्रकारच्या आरोग्य तपासण्या बंधनकारक राहणार असून या तपासणीचा खर्च महामंडळातर्फे करण्यात येणार आहे.
प्रवासी सेवेची गुणवत्ता वाढविण्यासाठी महामंडळाने अभिनव योजना
एसटी महामंडळाकडून प्रवासी वाहतुकीसाठी राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या व महत्त्वाच्या ठिकाणी वाहतूक सेवा दिली जाते. प्रवासी सेवेची गुणवत्ता वाढविण्यासाठी महामंडळाने अभिनव योजना आणल्या असून प्रामुख्याने बसेसच्या रचनेत व रंगसंगतीतही बदल करण्यात आलेला आहे. २ बाय २ आसन व्यवस्थेसह परिवर्तन बसेस, अधिक आरामदायी आसनव्यवस्थेसह निमआराम बसेस महामंडळाने पुरविलेल्या आहेत. सोबतच आणखी नवीन ई-बसेस (E-Buses) उपलब्ध केल्या आहे. नागपूर विभागात आठ आगार असून सर्वच आगारांत ४० वर्षांवरील कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांचे निरोगी आरोग्य राहावे आणि त्यांनी सक्षमपणे कार्य करावे, या उद्देशाने एसटी महामंडळात कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ दरम्यान धर्मवीर आनंद दिघे आरोग्य तपासणी योजना लागू करण्यात आली आहे. ४० वर्षांवरील महामंडळातील कर्मचाऱ्यांनी आरोग्य तपासणींतर्गत सीबीसी, थायरॉइड, ब्लड शुगर एचबीएआयसी, कोलेस्ट्रॉल, लिव्हर फंक्शन, किडनी फंक्शन, बोन डेन्सिटी, एक्स-रे, ईसीजी, सीआरपी टेस्ट, आयटेस्ट, मॅमोग्राफी (फक्त महिलांसाठी) या तपासण्या करणे बंधनकारक आहे ?
परंतु अनेक कर्मचाऱ्यांनी आरोग्य तपासणी केली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने ४० वर्षांवरील सर्व कर्मचाऱ्यांनी आरोग्य तपासणी करण्याबद्दलपत्र काढले आहे. या पत्रात सर्वांना दोन आर्थिक वर्षात एकदा निरोगी आरोग्य राहावे हा महामंडळाचा उद्देश आरोग्य तपासणी करणे बंधनकारक आहे. ११ प्रकारच्या आरोग्य तपासणीपैकी एकही तपासणी कर्मचाऱ्याने केली नाही तर महामंडळातर्फे देण्यात येणाऱ्या रकमेची प्रतिपूर्ती करण्यात येणार नसल्याचेही महामंडळाच्या सूत्रांनी म्हटले आहे.
सर्वच कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी का नाही?
आधुनिक जीवनशैलीमध्ये आजचा युवक जगत आहे. त्यांचे खानपान, ड्युटीच्या सवयी यामुळे सर्वांनाच कमी-अधिक प्रमाणात व्याधी सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आरोग्य तपासणीसाठी चाळीस वर्षांची अट अयोग्य आहे. सरसकट सर्वच कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली पाहिजे. शासनाकडून हा निर्णय का घेण्यात आला नाही, अशी चर्चा एसटीच्या वर्तुळात चर्चेत आहे.