काही लोक ठरवून सुपारी घेऊन आरोप करतात, असं म्हणत पर्यावरण मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी जाहीरपणे आपली खंत व्यक्त केली.
राजकारण म्हणजे गढूळ पाण्यात कपडे धुण्यासारखे आहे. आपण किती दिवस त्यात तुरटी फिरवायची, काही लोक ठरवून सुपारी घेऊन आरोप करतात, असं म्हणत पर्यावरण मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी जाहीरपणे आपली खंत व्यक्त केली. तर कशातही आपलं नाव ओढतात, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी राजकारणातील टीका-टिप्पणीवर खंत व्यक्त केलीय. जालना येथे शिवसेनेच्यावतीने मंत्री पंकजा मुंडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. तुमच्या नजरेत मला गोपीनाथ मुंडे दिसतात, ती नजर खाली जाऊ नये म्हणून राजकारणात असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. पुढे त्या असेही म्हणाल्या, मला कायम वाटतं तुमच्या सगळ्यांच्या अपेक्षा मी कशा पूर्ण करणार? मला टेन्शन येतं. मग मला तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यांमध्ये गोपीनाथ मुंडे दिसतात. माझं कौतुक गोपीनाथ मुंडे करायचे, तुम्हीही करता. मुंडे साहेब विचारायचे, पंकजा आली का? कशी चालली, कशी बोलली? माझ्यासारखी बोलते का? एक दिवस मला म्हणाले माझं काही काम नाही, ही माझी शेवटची निवडणूक. मी त्यांना विचारलं असं का म्हणता? तर म्हणाले समाज ज्या हातात द्यायचा ते हात तयार झालेत. मी पुढची निवडणूक लढणार नाही असं गोपीनाथ मुंडे म्हणाले होते, असे म्हणत पंकजा मुंडे काहिशा भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले.
Published on: Feb 02, 2025 01:16 PM