पिंपरी : पुढारी वृत्तसेवा
आवक वाढल्याने फळभाज्यांसह पालेभाज्यांच्या दरात निम्म्याने घट झाली आहे. मात्र पावसामुळे टोमॅटोची कमी आवक पाहता मालाला चांगला भाव मिळत आहे. बाजारातून गायब झालेला मटार आता सामान्यांच्या आवाक्यात आल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.
श्रावण, गौरी गणपती, आणि पितृपक्षातील शाकाहारीपर्वानंतर रविवारी भाजी मंडईकडे ग्राहकांनी पाठ फिरविल्याने मालाचे दर घटल्याची चर्चा विक्रेत्यांमध्ये सुरू होती. बाजारात प्रतिकिलो ३०० पार गेलेला मटार आता दीडशेच्या आस- पास तर भेंडी, गवार, वांगी, कोबी, चवळी, तोंडलीचे दर खाली आले आहेत.
टोमॅटो आणि कांद्याच्या दरात वाढ झाली आहे. मोशी उपबाजार, चिंचवड, आकुर्डी तसेच पिंपरी येथील लाल बहादुर शास्त्री भाजी मंडईतील किरकोळ बाजारात चाळीस रूपये प्रतिकिलो असलेला टोमॅटो आता साठ ते सत्तर रूपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. तर कांदा सत्तर रूपये दराने विक्री होत आहे. तरकारीसह पालेभाज्यांचेही दर घटल्याने मेथी, पालक, कोथिंबीर वीस रूपये प्रती जुडी दराने विक्री होत आहे.
कर्नाटक राज्यातील तोतापुर कैरी बाजारात आली आहे. हंगाम नसतानाही कैरी बाजारात काही मोजक्या विक्रेत्यांकडे विक्रीसाठी आहे. सर्वांना आवडणारी आंबट गोड तोतापुरी कैरी बाजारात
आल्याने ग्राहकांनी मोठी खरेदी केली. आवक कमी असल्याने कैरीला चांगला भाव असून, बाजारात प्रतिकिलो १५० ते १६० रूपये दराने विक्री होत आहे.