Published on
:
30 Sep 2024, 7:17 am
सोलापूर, संगमेश जेऊरे
मागील काही वर्षांपासून वातावरणात होणाऱ्या बदलामुळे त्याचे गडद आणि गंभीर होत आहेत. वातावरणातील कार्बन शोषून घेण्यासाठी हरित आच्छादन झपाट्याने वाढविण्यासाठी पुढील पाच वर्षात राज्यात १०.३१ लक्ष हेक्टरवर मनरेगा योजनेतून बांबू लागवड तर ११ लाख हेक्टरवर फळझाडे लागवड होणार आहे. त्यासाठी पुढील पाच वर्षाचा कालबध्द कार्यक्रम शासनाने निश्चित केला असून, एकूण भुभागाच्या २० टक्के जमीनी या फळलागवड व बांबू लागवडीने फुलविण्याची हरित महाराष्ट्र कार्यमुक्त रचना निश्चित केली आहे.
हरीत आच्छादन शाश्वत राहण्यासाठी सतत सिंचन व देखभालीची गरज लक्षात घेऊन फळ व बांबू जगविण्यासाठी सिंचन व्यवस्था तयार केली जाणार आहे. बांबूसह हरीत आच्छादन पिक सिंचित असल्यास त्याची उत्पादकता अधिक असते. त्यासाठी मनरेगांतर्गत सर्व हरीत आच्छादन पिक सिंचित करण्याचा प्रयत्न आणि चांगले उत्पन्न देणाऱ्या पिकाचे लागवड होणार आहे. यातून अल्प व अत्यल्प भूधारक कुटुंबांचा विकास होण्यास मदत होणार आहे.
४० हेक्टर जमीनीवर हरीत आच्छादन
केंद्र शासनाने राज्यात २ कोटी ५ लक्ष हेक्टर वैयक्तिक जमीन मालकीच्या २० टक्के म्हणजेच साधारण ४० लक्ष हेक्टर जमिनीवर हरीत आच्छादन तयार करण्याचे उद्दीष्ट दिले आहेत. तो पाच वर्षाच्या कालखंडात टप्या टप्याने केली जाणार आहे. जमिनीवर पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब थांबविण्याचे कार्य केल्यावर चांगले पर्जन्यमान असलेल्या भागातील प्रत्येक शेत सिंचित होणार आहे. त्यातून प्रत्येक शेताला पाणी हे उद्दिष्ट साध्य होणार आहे.
प्रत्येक ग्रामंपचायतीत ११ विहिरी
राज्यातील ग्रामपंचायतीस टप्प्या-टप्प्याने प्रत्येक शेताला पाणी देण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी गाव जल आराखडा तयार करुन त्याच्या अंमलबजावणीचे कार्य करावे लागणार आहे. त्यासाठी राज्यातील प्रत्येक दरवर्षी ग्रामपंचायतीला १५ विहिरी, १५ शेततळी, ५० जलतारा बांधण्याचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. पुढील वर्षापर्यंत ही योजना सुरु राहणार आहे.
पुणे, अहिल्यानगरमध्ये सर्वाधिक फळलागवड
रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून २०२४-२५ या वर्षात पुणे विभागात सर्वात जास्त फळलागवड पुणे आणि अहिल्यादेवी नगर या जिल्ह्यात होणार आहे. प्रत्येकी ३ हजार हेक्टरवर विविध फळांची लागवड होणार आहे. तर सोलापूर जिल्ह्यात २७०० हेक्टर तर सांगली जिल्हयात १६०० हेक्टर, सातारा जिल्ह्यात १२०० हेक्टर, कोल्हापूर जिल्ह्यात ६०० हेक्टर शेतजमीनीवर फळलागवड होणार आहे. यात फळबागा, इतर वृक्ष, फुलपीक, तुती, औषधी व वनस्पतींचाही समावेश आहे. तर चालू वर्षात पुणे सांगली जिल्ह्यात प्रत्येकी ३ हजार हेक्टरवर तर सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येकी ५ हजार हेक्टरवर बांबू लागवड केली जाणार आहे.