आ. नीलेश राणेpudhari photo
Published on
:
05 Feb 2025, 12:55 am
Updated on
:
05 Feb 2025, 12:55 am
रत्नागिरी : रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठका यशस्वी झाल्या. यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर निधी आणण्यात दोन्ही जिल्ह्याचे पालकमंत्री यशस्वी होतील आणि त्यातून जिल्ह्यांचा विकास होईल, असा विश्वास कुडाळ मालवणचे आ. नीलेश राणे यांनी व्यक्त केला. तर सातत्याने विचित्र वक्तव्ये करणार्या उबाठा खा. संजय राऊत यांचा समाचार घेताना ते कर्मदरिद्री माणूस असून, नेहमीच निगेटिव्ह बोलत असल्याचे म्हणाले.
रत्नागिरी दौर्यावर आलेल्या आ. निलेश राणे यांनी ही प्रतिक्रिया दिली. सिंधुदुर्गमध्ये सोमवारी झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीमध्ये जरी खासदार म्हणून राणे साहेब, पालकमंत्री म्हणून नितेश राणे आणि मी स्वतः आमदार म्हणून असलो तरीही याला कोणताही भावनिक किंवा कौटुंबिक दृष्टीने पाहू नका. जनतेने आम्हाला विकासासाठी निवडून दिले आहे, याची संपूर्ण जाणीव आम्हाला आहे. आमच्यावरील जबाबदारीची संपूर्ण कल्पना आहे. त्यामुळे यापुढेही केवळ सिंधुदुर्गच्या विकासासाठीच काम केले जाईल, असे आ. निलेश राणे या वेळी म्हणाले. तर पालकमंत्री म्हणून पहिलीच नियोजन समितीचा बैठक असतानाही ती यशस्वीपणे चालवली याच मला कौतुक आहे अशा शब्दांत त्यांनी ना. नितेश राणे यांचे कौतुक केले.
सिंधुदुर्ग प्रमाणे रत्नागिरीतही डीपीडीसीची मीटिंग यशस्वी झाली, चांगल्या वातावरणात बैठक झाली. इतिहासात प्रथमच रत्नागिरीमध्ये प्रारूप आराखडा हा 860 कोटींचा झालेला आहे, तर सिंधुदुर्गमध्ये प्रारूप आराखडा प्रथमच 400 कोटींवर गेला आहे. याबद्दल ना. उदय सामंत आणि ना. नितेश राणे यांचे अभिनंदन करताना हा सगळा पैसा जिल्ह्याच्या विकासासाठी वापरला जाणार आहे याचे समाधान असल्याचेही ते म्हणाले.
शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निलेश राणे यांनी टीका केली आहे. सातत्याने विचित्रे वक्तव्य करणार्या खा. राऊत यांचा त्यांनी समाचार घेतला. संसद कसे चालवायचे हे संजय राऊतांकडून शिकण्याची वेळ अद्याप देशावर आलेली नाही. तिसर्यांदा बहुमताने देशाचे पंतप्रधान जे झालेत त्यांंना, कधीही जनतेतून साधा नगरसेवक म्हणूनही निवडून न आलेला माणूस शिकवण्याचा प्रयत्न करतो यावरून त्यांच्या विचारांची पातळी कळते. संजय राऊत हा कर्मदरिद्री माणूस आहे, त्यांच्या विचारातून काहीच चांगलं निघणार नाही. देश आणि महाराष्ट्रासाठी काही चांगलं होणार नाही, त्यामुळे त्यांच्याकडून कोणतीच अपेक्षा नाही असा टोलाही आ. राणे यांनी लगावला. संजय राऊत ज्या पद्धतीने बोलतात आणि त्याला प्रसिद्धी मिळते यावरून राज्यातील महत्वाचे विषय संपले आहेत का? राजकारण इतके हीन झाले आहे का असा सवाल आ. राणे यांनी केला.
रत्नागिरी गणेशोत्सव मंडळाच्या महागणपतीचे दर्शन त्यांनी मंगळवारी घेतले. माझ्या सहकार्यांनी रत्नागिरी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने पहिला वर्षी रत्नागिरीच्या महागणपतीची स्थापना केली आहे. आमदार झाल्यानंतर प्रथमच रत्नागिरीत आलो आहे, त्याची सुरुवात श्रीगणेशाचे दर्शन घेऊन व्हावी इच्छा होती, त्याप्रमाणे दर्शन घेऊन आता कामाला सुरुवात झाली आहे असेही आ. राणे म्हणाले.