उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते नांदेडमध्ये बोतल होते. मुख्यमंत्री फक्त मंत्रालयात बसायचं काम नाही, फेसबुक लाईव्ह नाही तर फेस टू फेस काम कारयचं. गरम पाणी प्या, तोंडाला मास्क लावा, एवढ्या पुरत काम नाही. लोकांना भेटावं लागतं, शेतकऱ्यांच्या बांधावर जावं लागतं, बहिणींना भेटावं लागतं, भावाला भेटावं लागतं. मी जिथे जातो तिथेच मंत्रालय सुरू होतं, ऑन द स्पॉट काम करतो. मी अडीच वर्षात एवढ्या सह्या केल्या सर्व रेकॉर्ड मोडले, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 460 कोटी रुपये दिले, किती लोकांचे जीव वाचले असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश देखील दिले आहेत. सगळ्यांनी मनापासून संकल्प केला तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेला भरघोस यश मिळेल. नांदेडमध्ये शिवसेनेचे तीन आणि महायुतीचे सगळे मिळून नऊ आमदार निवडून आणले आहेत. आता मुंबईत ठरलेले मतदारसंघ वगळता कोणीही मतदारसंघ सोडणार नाही. आमदारकीच्या निवडणुका झाल्या आहेत, आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका हे आता आपलं फाउंडेशन आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
सत्ता येते सत्ता जाते पुन्हा येते, मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं हे पाहिलं पाहिजे. विश्वास, इमानदारी, प्रामाणिकपणा विकत घेता येत नाही, ही आपल्या शिवसैनिकांची पुंजी आहे. कार्यकर्ते जोडा, कार्यकर्ता जपा, पदाधिकारी नेमताना जवळचा परका असा भेदभाव करू नका, जे आपण पेरलं ते उगवलं, विधानसभेत 267 जागा येणे म्हणजे इतिहास आहे. सुवर्ण अक्षराने नोंद करावा असा इतिहास आहे. सगळ्या महाराष्ट्रातून शिवसेनेत प्रवेश होत आहेत. प्रवेशांना वेग आला आहे, आपल्या पक्षात कोणी मालक नाही, कोणी नोकर नाही हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, असं एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटलं आहे.