छत्रपतींच्या अपमानाचा भडका:राहुल सोलापूरकरविरुद्ध शिवसैनिकांचे आक्रमक आंदोलन, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
2 hours ago
1
मराठी अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर ठाकरे गटाने तीव्र आंदोलन केले. पुण्यातील कोथरूड गावठाण येथील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा स्मारकाजवळ शिवसैनिकांनी सोलापूरकर यांच्या विरोधात निषेध नोंदवला. संतप्त शिवसैनिकांनी अभिनेत्याच्या फोटोला जोडे मारून पायदळी तुडवले आणि त्यांच्या घराकडे मोर्चा काढला. पोलिसांनी अडवल्यानंतर शिवसैनिकांनी त्यांच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन केले. शिवसेना पुणे शहरप्रमुख संजय मोरे यांनी सोलापूरकर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यांनी म्हटले की, सोलापूरकर यांनी छत्रपतींच्या पायावर नाक घासून माफी मागितली पाहिजे, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करून त्यांचा कडेलोट करण्यात येईल. आंदोलनात पुणे शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह गजानन थरकुडे, उपशहर प्रमुख राजेश पळसकर, प्रशांत राणे, भरत कुंभारकर, नगरसेवक योगेश मोकाटे, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, शहरसंघटक राजेंद्र शिंदे आणि अन्य शिवसैनिक उपस्थित होते. दरम्यान, अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानावर छत्रपतींचे वंशज आणि खासदार उदयनराजे भोसले यांनीही संताप व्यक्त केला. महापुरुषांबद्दल अशी विधाने करणाऱ्या लोकांना दिसेल तिथे ठेचले पाहिजे, असे टोकाची प्रतिक्रिया उदयनराजे यांनी दिली. या विकृतीची वाढ झाल्यास देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होईल, असेही ते म्हणाले. राहुल सोलपूरकरने तसे विधान केले तर त्याला औरंगजेबाची औलादच म्हणायला पाहिजे, असा संताप उदयनराजे यांनी व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आग्र्याहून सुटका करताना मुघलांना लाच दिली होती, असे विधान अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केले होते. त्यानंतर त्यांच्याविरोधात राज्यात संतापाची लाट उसळली. राज्यभरातील शिवप्रेमींनी त्यांच्या या विधानाचा निषेध केला जात आहे. राहुल सोलापूरकराचे विधान काय? छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिस्तीचे मोठेपण कळावे म्हणून हिरकणीची कथा रचली गेली आहे. गडाचे दरवाजे सूर्यास्ताला बंद व्हायचे वगैरे सांगत. हिरकणी घडलेलीच नाही. असे काहीही नाही. असा इतिहासच नाही. पण ते लिहिले गेले, असा दावा राहुल सोलापूरकर यांनी केला होता. महाराज आग्र्याहून सुटले ते मिठाईचे पेटारे वगैरे काही नव्हते. महाराज चक्क लाच देऊन आले आहेत. त्यासाठी किती हुंड्या सोडवल्या याचे पुरावे आहेत. औरंगजेबाच्या वजीराला आणि त्याच्या बायकोलाही लाच दिली गेली. मौसिन खान किंवा मोईन खान नाव आहे त्याचे. त्याचे परवाने घेऊन सगळे बाहेर पडले होते. स्वामी परमानंद शेवटचे पाच हत्ती घेऊन गेले त्याच्या परवान्याची खूणही आहे अजूनही. गोष्टी रुपात करताना ते रंजक करुन सांगितलं गेले आहे. त्यामुळे खरा इतिहास लोकांसमोर जात नाही, असाही दावा राहुल सोलापूरकर यांनी केला होता.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)