तर उद्धव ठाकरे युतीतून बाहेर पडले नसते, देवेंद्र फडणवीस यांचा मोठा दावा; काय दिलं कारण?

3 hours ago 1

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना-भाजपच्या युतीबाबतचे मोठे खुलासे केले आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बंददाराआडच्या चर्चेत अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याचा कोणताही फॉर्म्युला ठरला नव्हता. उलट उद्धव ठाकरे यांनी माझ्याकडे अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद देण्याची मागणी केल्यानंतर मी अमित शाह यांच्याशी बोललो. तेव्हा अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांचा हा प्रस्ताव सपशेल फेटाळून लावला होता, असा दावा करतानाच उद्धव ठाकरे यांना मी उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोटही केला आहे. तसेच उद्धव ठाकरे युतीतून का बाहेर पडले? याचं कारणही स्पष्ट केलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत 2019मधील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात येत असलेले दावे खोडून काढले आहेत. त्या निवडणुकीत भाजपचा आकडा 120 वर गेला असता तर उद्धव ठाकरे कधीच भाजप सोडून गेले नसते. पण जसंही त्यांच्या लक्षात आलं की नंबर गेम फसत आहे. आम्ही सरकार बनवू शकतो. तेव्हा त्यांनी आपला रंग बदलला, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

परस्पर निर्णय घेतला

निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि सर्व पर्याय खुले असल्याचं सांगितलं. आम्ही दुसऱ्या टोकाला जाऊ शकतो असंही ते म्हणाले. त्यांनी पीसी घेतली तेव्हापासून ते त्यांचं सरकार येईपर्यंतच्या दिवसापर्यंत त्यांनी माझा एकही फोन घेतला नाही. माझ्याशी साधी चर्चाही केली नव्हती. त्यांनी परस्पर निर्णय घेतला होता. त्यांनी पहिल्याच दिवशी दुसरीकडे जाण्याचं ठरवलं होतं, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

छुप्या पद्धतीने काय ठरलं?

उद्धव ठाकरे यांनी ही भूमिका घेतल्यानंतर आमच्या एक गोष्ट लक्षात आली. ती म्हणजे निवडणुकीपूर्वी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली होती. त्यात शिवसेनेची लढत जिथे काँग्रेस विरोधात आहे, तिथे एनसीपीने शिवसेनेला मदत करायची आणि जिथे एनसीपीची लढत भाजपशी आहे, तिथे शिवसेनेने एनसीपीला मदत करायची हे ठरलं होतं. कारण शिवसेनेच्या जागा कमी झाल्या तर भाजप सरकार बनवेल अशी भीती होती. जे काही प्रीपोल होते त्यात भाजपचं सरकार येणार असल्याचं स्पष्टच दिसत होतं, असं फडणवीस म्हणाले.

राहुल गांधी मुन्नाभाई एमबीबीएस

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात पाच महिन्यात मतदानाचा टक्का कसा वाढला? असा सवाल केला होता. त्यालाही फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. जनतेने आपली साथ सोडलीय हे जोपर्यंत राहुल गांधी यांना समजणार नाही, तोपर्यंत त्यांची अशाच पद्धतीने हार होणार आहे. कधी कधी तुमच्यासोबत कोण आहेत हे महत्त्वाचं ठरतं. पीसी घेताना संजय राऊत यांना घेऊन बसणार तर असेच विचार येणार. जे पत्र निवडणुकीनंतर आयोगाला महाविकास आघाडीने लिहिलं होतं. त्याला आयोगाने उत्तर दिलं आहे. राहुल गांधी यांची खासियत म्हणजे त्यांना सत्य कितीही सांगितलं तरी ते ऐकत नाही. ते मुन्नाभाई एमबीबीएस आहेत. ते आपल्याच विश्वात असतात, अशी बोचरी टाकी त्यांनी केली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article