तर शिवसेनाच काय, आपलं धनुष्यबाणही दिसलं नसतं; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सर्वात मोठा दावा

2 hours ago 1

आज विजयादशमी अर्थात दसरा. या निमित्ताने दरवर्षी प्रमाणे राज्यात अनेक राजकीय सभा , मेळावे पार पडणार आहेत. आज संध्याकाळी मुंबईत शिवाजी पार्कव शिवसेना ठाकरे गटाचा मेळावा होणार आहे तर दुसरीकडे आझाद मैदानावर शिंदे गटाचाही मेळावा होईल. या दोन्ही मेळाव्यांकडे राज्याचे लक्ष लागले असून आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन्ही नेते एकमेकांवर काय प्रत्यारोप करतात, काय टीका करतात हे आज संध्याकाळी स्पष्ट होईलत,पण त्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ‘ आणखी थांबलो असतो तर आपली शिवसेना दिसली नसती. आपलं धनुष्यबाणही दिसलं नसतं ‘ असं म्हणत शिंदे यांनी ठाकरेंवर निशाणा साधला. मुंबईतील चुनाभट्टी येथील एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.

 म्हणून मी एवढं मोठं धाडस केलं

जी काही कुचंबणा होत होती, घुसमट होत होती, शिवसैनिकाचं खच्चीकरण होत होतं. कोविडच्या नावाखाली सगळं बंद होतं, मंदिर बंद, सगळी काम बंद होती. त्या नावाखाली सण , उत्सव सगळं बंद होतं. पण आपलं सरकार आणण्याचं काम आम्हाला करावचं लागलं, कारण आणखी थांबलो असतो, तर ही शिवसेना तुम्हाला दिसली नसती, धनुष्यबाणही दिसला नसता.

तोच गहाण टाकलेला धनुष्यबाण वाचवण्यासाठी, तो सोडवण्यासाठी या एकनाथ शिेदेने एवढं मोठं धाडस केलं. उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत मिळून मविआचं सरकार स्थाप केलं, त्याचा संदर्भ देत एकनाथ शिंदे यांनी हे वक्तव्य करत ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं.

विरोधकांना हैवानाचा पुळका कसा येतो ?

विरोधकांना हैवानाचा पुळका कसा येतो ? असा सवाल विचारत अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणावरूनही एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली आहे. बदलापूरच्या केसमध्ये त्या हैवानाच्या ( अक्षय शिंदे) बायकोने पोलिसांकडे जाऊन तक्रार केली की हा माणूस नव्हे हैवान आहे. आणि त्याने जेव्हा पोलिसांवर गोळीबार केला, तेव्हा विरोधकांना त्या हैवानाचा पुळका कसा येतो ? हेच लोक त्याला फाशी द्या अशी मागणी करत होते. तिथे बदलापूरला ट्रेन थांबवून ठेवली होती. सगळ्यांनी राजकारण केलं, लाडकी बहीण नको, सुरक्षित बहीण हवी असे बोर्ड लावले. मग त्याने पोलिसांवर गोळीबार केला, तेव्हा काय पोलिसांनी गोळी खायची होती का, त्याला जाऊ द्यायचं होतं का ? असा सवाल त्यांनी विचारला.

जो माझ्या लाडक्या बहीणींकडे,मुलींकडे वाकड्या नजरेने पाहील, अत्याचार करण्याचा प्रयत्न करेल, त्याला फाशीची शिक्षा दिली जाईल. आमच्या सरकारमध्ये चुकीला माफी नाही. असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी ठणकावून सांगितलं.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article