नागपूर -दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा! हेही आजच्या निकालाने दाखवून दिले. दिल्लीतील मराठी बहुल मतदारसंघात कमळ फुलले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतील मराठी जनतेला सोबत येण्याची साद घातली.
अनेक बैठकी, जाहीरसभा घेतल्या. घरोघरी प्रचार केला. त्याचा सकारात्मक परिणाम निकालातून दिसून आला असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातील अपयशामुळे सैरभैर झालेले राहुल गांधी आणि त्यांचे सख्खेसोबती उबाठा सेनेचे नेते कालच महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या मताधिक्यावर मीठ चोळून गेले. मतांचे हिशोब मागत होते. मतदारांचा, लाडक्या बहिणींचा अपमान करत होते. आज दिल्लीतील जनतेने त्यांना 'गेटआऊट ' म्हटले. एकही जागा काँग्रेस मिळवू शकली नाही. आता तरी, मतदारांच्या मतांचा आदर करण्याचे काँग्रेसने शिकावे. आरोप करण्याचे सोडून आत्मपरिक्षण केले पाहिजे.
दिल्लीच्या आजच्या विजयाची गुढी महाराष्ट्राच्या यशाने उंचावली आहे. दिल्लीचे तख्त भाजपाने काबीज केले. ही अतिशय आनंदाची घटना आहे. गेली २७ वर्षे भाजपा कार्यकर्ते आजच्या दिवसाची प्रतीक्षा करत होते. संघटन बांधणीला, टीमवर्कला यश आले.
दिल्ली के दिल में मोदी हा नारा या निकालाने खरा करून दाखवला. जनतेच्या पैशावर आपली घरे भरण्याचा नाद आम आदमी पार्टीच्या नेत्यांना लागला होता.आपच्या नेत्यांमध्ये भाजपा द्वेषाची चढाओढ होती. बोलण्यातून विखार उतरत होता. या द्वेषावर दिल्लीतील देशभक्त जनतेने रामबाण उपाय शोधला. आप सरकारची मद्याची नशा उतरविली.