नक्षली शक्तिहीन म्हणून मरण्यापेक्षा जगण्याचा पर्याय निवडला:शरणागत जहाल नक्षली तारक्काने उघड केले जंगलातले वास्तव

2 hours ago 1
आता नवीन नक्षल भरती नाही, जनाधारही राहिलेला नाही. गावकऱ्यांचा पाठिंबा नाही, पण आता सरकारने कठाेर पावले उचलली आहेेत. केंद्र सरकारने मार्च २०२६ पर्यंत नक्षल्यांचे उच्चाटन करण्याचे ठरवले आहे. दुर्गम भागात सरकारची विकासकामे सर्वदूर पोहोचत आहेत. शिवाय माझी तब्येतही खालावली आहे. शांततेने जगायचे की एक दिवस पोलिसांच्या गाेळीने मरायचे यापैकी एक निवडायचे होते. मी जगण्याचा पर्याय निवडला असे तारक्काने “दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. तारक्का ही जहाल नक्षलवादी, दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीची सदस्य आणि नक्षल्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य सोनू ऊर्फ भूपती याची पत्नी आहे. विमला शेंद्रा सिडाम हे तिचे मूळ नाव आहे. वयाच्या १५ व्या वर्षी तिने दलममध्ये प्रवेश केला. अचानक नक्षली मोठ्या संख्येने आत्मसमर्पण करीत आहे. यामागे मरणाची भीती आणि वैद्यकीय कारणेही आहेत, पण हे काही भाकपचे (माओवादी) धोरण नाही. एक विशिष्ट धोरण म्हणून कोणीही शरण येत नाही, असे तारक्काने स्पष्ट केले. जंगलात जबाबदारी घेणे जोखमीचे होते म्हणून मुलबाळ होऊ दिले नाही, असेही तिने सांगितले. संविधानविरोधी आणि देशविरोधी कृत्यामुळे आपला विकास होत नाही, हे आता नक्षल्यांच्या लक्षात आल्यामुळे अनेक जण देशाची व्यवस्था आणि संविधानावर विश्वास ठेवून शरण येत आहेत. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. डीव्हीसीएम कुतुल एरिया कमिटी व त्याची पत्नी कल्पना गणपती तोर्रेम ऊर्फ भारती ऊर्फ मदनी (डीव्हीसीएम) हीही माझ्यासोबतच शरण आली. ६२ वर्षीय तारक्का नक्षलवाद्यांच्या दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीची सदस्य तसेच दंडकारण्य विभागाच्या वैद्यकीय पथकाची प्रमुख होती. अहेरी तालुक्यातील किष्टापूर येथील मूळ रहिवासी असलेली तारक्का ही मागील ३८ वर्षांपासून नक्षल चळवळीत सक्रिय होती. तिची प्रचंड दहशत होती. अनेक चकमकी आणि खुनांमध्ये तिचा सहभाग होता. सरकारच्या आक्रमक धोरणामुळे नक्षली माघारले आहेत. भाकप (माओवादी) आता खूप कमजोर झाली आहे. मोठी उडी घेण्यासाठी वाघ चार पावले मागे घेतो. तशी नक्षल्यांनी माघार घेतली आहे. मात्र नक्षली पुन्हा वाघासारखी मोठी उडी घेईल की नाही याबद्दल सांगता येणार नाही. कारण केंद्र आणि राज्य सरकार आता आक्रमक आहे. शरण आल्यास सन्मानाचे जगणे आहे. अन्यथा हमखास मरणे अटळ आहे, हे पटल्याने अनेक जण शरण येत आहेत, असे तारक्काने सांगितले. ८ नोव्हेंबर २०१० रोजी लाहेरी-मलमपोडूर गावांमध्ये झालेल्या चकमकीत १७ पोलिस शहीद झाले होते. या चकमकीचे नेतृत्व तारक्काने केले होते. शिवाय त्याची चित्रफीतही तिने प्रसारित केली होती. सामान्य महिला व पुरुषांच्या वेशभूषेत पाने तोडत असल्याचे भासवून नक्षलवाद्यांनी पोलिसांवर हल्ला केला होता. भामरागड आणि एटापल्ली तालुक्यातील दुर्गम गावांमधील आदिवासींमध्ये तारक्का वावरत होती. त्यामुळे तिच्यावर कुणी संशयही घेत नसे, परंतु वय वाढल्याने मागील काही वर्षांपासून ती अबुजमाडमध्ये वास्तव्यास होती.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article