महागाई दरानुसार स्कॉलरशिपचे पैसे वाढवा; परीक्षा शुल्क माफ करा:सम्यक विद्यार्थी आंदोलनातर्फे स्कॉलरशिप परिषद‎

2 hours ago 1
अशोक वाटिकेत वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनातर्फे स्कॉलरशिप परिषद आयोजित करण्यात आली. महागाई दरानुसार स्कॉलरशिपच्या पैशात वाढ करा, दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि परीक्षा शुल्क माफ करा आदींसह अनेक महत्त्वाचे ठराव घेण्यात आले. या ठरावांच्या अंमलजावणीसाठी सरकारी पातळीवर निवेदन देण्यात येणार आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी प्रणालीवर भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, मॅट्रिकोत्तर शिक्षण फी परिक्षा फी प्रदाने, राजी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृती,व्यावसायिक पाठ्यक्रमांशी संलग्न असलेल्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विद्यावेतन व व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूती योजना राबवण्यात येतात. मात्र या योजनांचा लाभ वेळेत मिळत नाही. दरम्यान सम्यक विद्यार्थी आंदोलनातर्फे पार पडलेल्या स्कॉलरशिप परिषदेत विविध मुद्दयांवर मंथन करून काही महत्त्वाचे ठराव घेण्यात आले. या परिषदेत अध्यक्ष म्हणून पी.जे. वानखेडे, प्रमुख मार्गदर्शक महेश भारतीय (राष्ट्रीय खजिनदार वंचित बहुजन आघाडी) होते. विचार मंचावर सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हाध्यक्ष इंजि. धिरज इंगळे, जिल्हा प्रसिद्धि प्रमुख अक्षय डोंगरे,श्रीकांत घोगरे युवक आघाडी अध्यक्ष, राजकुमार दामोदर महासचिव, नंदकुमार डोंगरे जिल्हा महासचिव भारतीय बौद्ध महासभा,रमेश सरकटे,मजर खान महानगर कार्यध्यक्ष , वैभव खडसे शहर अध्यक्ष युवा आघाडी , नितीन सपकाळ रुग्ण सेवा समिती सदस्य, , मोहित दामोदर बुलढाणा जिल्हाध्यक्ष, अभिषेक सपकाळ वाशिम जिल्हाध्यक्ष, प्राची दामोदर उपस्थित होते. स्कॉलरशिप परिषदेमध्ये सम्यक विद्यार्थी आंदोलन पदाधिकारी यांनी काही ठराव पारित केले. यात स्वाधार योजनेचे पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यात नियमित आले पाहिजे. बार्टी, सारथी व महाज्योती सारख्या स्वायत्त संस्थेप्रमाणे मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वायत्त संस्था निर्माण करावी. विद्यार्थ्यांना त्यांची स्कॉलरशिप ही चालू शैक्षणिक वर्षातच मिळावी. दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि परीक्षा शुल्क हे माफ करण्यात यावे. समाज कल्याण विभागातील वस्तीगृह, मागासवर्गीय, आदिवासी आणि महिला वस्तीगृहाची तरतूद २०२५-२०२६ या चालू वर्षाच्या आर्थिक बजेटमध्ये करण्यात यावी. महागाई दरानुसार स्कॉलरशिपच्या पैशात वाढ करण्यात यावी. बार्टी मार्फत आयबीपीएससाठी देण्यात येणाऱ्या स्कॉलरशिपमध्ये वाढ करण्यात यावी. स्कॉलरशिप संदर्भात नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांमध्ये महाविद्यालय स्तरावर जनजागृती कार्यक्रम राबविण्यात यावे. शिष्यवृत्ती अर्ज प्रलंबित राहणे बंद व्हावे शिष्यवृत्ती मिळण्यास पात्र विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज महाडीबीटी संकेतस्थळावर भरून घेणे, तसेच प्रलंबित अर्ज निकाली काढण्याच्या दृष्टीने समाजकल्याण सहाय्यक आयुक्तांच्या उपस्थितीत महाविद्यालयाच्या प्राचार्यांची कार्यशाळा गत महिन्यात पार पडली होती. अनुसूचित जाती प्रवर्गाचे ७ हजार ८५९ अर्ज भरण्यात आले. त्यावेळी महाविद्यालयस्तरावर ४ हजार ६२३ अर्ज प्रलंबित होते. त्यामुळे अर्ज प्रलंबित राहणे बंद व्हावे, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून यानिमित्ताने होत आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article