डबल महाराष्ट्र केसरी पै. शिवराज राक्षे - पै. पृथ्वीराज मोहोळ यांच्यात सांगलीत लढत होणार आहे. Pudhari Photo
Published on
:
06 Feb 2025, 1:50 pm
Updated on
:
06 Feb 2025, 1:50 pm
विटा : पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पंचांच्या कथित निकालामुळे सुरू झालेला वाद आता सांगली च्या मातीत संपविण्याचा निर्धार डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांनी केला आहे. यंदाचा महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळ आणि डबल महाराष्ट्र केसरी पै. शिवराज राक्षे यांच्यात सांगलीत लढत निश्चित करण्यात आली आहे. या लढतीला दोन्ही मल्लांनी हिरवा कंदिल दाखवला आहे. त्यामुळे हा वाद आता सांगलीत संपेल, अशी आशा पाटील यांनी व्यक्त केली आहे. (Maharashtra Kesari Controversy)
याबाबत चंद्रहार पाटील यांनी पत्रकारांना सांगितले की, ‘‘सांगलीतील तरुण भारत स्टेडियमवर हे मल्लयुद्ध होईल. त्यादृष्टीने आम्ही तयारीला सुरवात केली आहे. पै.शिवराज राक्षे लढायला तयार होताच, आज गुरुवारी पै. पृथ्वीराज मोहोळ याने ही होकार दिला आहे. कुस्ती शौकिनांच्या मनात महाराष्ट्र केसरी आखाड्यात चुकीच्या निकालानंतर निर्माण झालेल्या वादातून जी सल आहे, ती दूर होईल. शौकिनांना एक चांगली कुस्ती पहायला मिळेल. वाद बाजूला ठेऊन मल्ल नेहमी पुढे जात असतात. हा संदेश महाराष्ट्रभर जाईल. एका पंचाच्या पाच सेकंदाच्या चुकीच्या निकालाने शिवराज राक्षे यांच्या करिअरला मोठा धक्का बसला आहे. मात्र, या घटनेने महाराष्ट्रातील कुस्ती बदनाम होऊ नये, याची काळजी घेणे आम्हा सर्वांची जबाबदारी आहे. त्यासाठी हे मल्लयुद्ध आवश्यक होते. त्यासाठी मी पुढाकार घेतला आहे.
ते म्हणाले, दोन्ही मल्लांनी अत्यंत सकारात्मक विचाराने या कुस्तीसाठी होकार दिला आहे. त्यांना प्रत्येकी २५-२५ लाख रुपयांचे मानधन आम्ही देणार आहोत. वाद या दोन मल्लांचा नव्हता आणि नसेल. दोघांनीही कुस्तीची सेवा केली आहे, पुढेही करणार आहेत. त्यांच्यातील या लढतीमुळे त्यांच्या मनावरील दडपणदेखील दूर होईल. सध्या निर्माण झालेले मतभेद, मनभेद दूर होतील, अशी अपेक्षा आहे.
चंद्रहार पाटील यांनी ‘महाराष्ट्र केसरी’ ही अत्यंत मानाची स्पर्धा असून राजकीय वाद, श्रेयवादातून दोन-दोन स्पर्धा होणे योग्य नाही, अशी भूमिका मांडली आहे. कुस्ती क्षेत्रातील राजकीय वाद बाजूला ठेवून महनिय नेत्यांनी एकविचाराने किमान या मानाच्या स्पर्धेचे सर्वोच्च स्थान अबाधित ठेवावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.