विधवांचे सौभाग्य अलंकार कायम ठेवण्याचा ग्रामसभेत घेतला ठराव:कोल्हापूर जिल्ह्यातील अंबप ग्रामपंचायतीचे पुरोगामी पाऊल
3 hours ago
1
कपाळावर कुंकू... हातात बांगड्या आणि गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्यवतीची ओळख. मात्र एखाद्या महिलेच्या पतीचे निधन झाले तर ती या सर्व गोष्टींचा त्याग करते. परंपरेनुसार तिला हा त्याग करायला भाग पाडले जाते. मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावाने पुराेगामी पाऊल उचलत महिलांचे हे अधिकार कायम ठेवण्याचे धाडस दाखवले आहे. विधवा महिलांनाही सौभाग्य अलंकाराचा अधिकार कायम ठेवण्याचा ठरावच अंबप गावच्या ग्रामपंचायतीने घेतला आहे. इतकेच नव्हे तर नुकत्याच झालेल्या प्रजासत्ताक दिनी या महिलांसाठी सामूहिक हळदी-कुंकवाचा कार्यक्रमही घेण्यात आला. यापूर्वी हेरवाड, रुकडी, माणगाव या गावानेही ही पुरोगामी परंपरा सुरू केली होती, त्याचे अनुकरण अंबप गावकऱ्यांनी केले आहे. हातकणंगले तालुक्यातील अंबप हे छोटेसे गाव. येथील लोकनियुक्त सरपंच दीप्ती विकासराव माने सांगतात, विधवा महिलांना सन्मानपूर्वक वागणूक द्यावी, हा विचार माझ्या मनात दोन वर्षांपासून घोळत होता. गावातील महिला, ज्येष्ठ नागरिक, तरुण- तरुणी अशा सगळ्या वयोगटातील लोकांशी मी याबाबत बोलायचे व त्यांचे मत जाणून घ्यायचे. अनेकांनी माझ्या या प्रस्तावाला पाठिंबा दिला. ज्यांचा विराेध होता त्यांना मी समजावून सांगितले. महिला कामानिमित्त घराबाहेर पडतात. त्यांच्या सुरक्षेसाठी देखील हा निर्णय घेण्याची गरज असल्याचे पटवून सांगितले. हा प्रसंग कोणावरही येऊ शकतो. त्यामुळे आपण अशा महिलांना धीरासोबतच सौभाग्य अलंकार कायम ठेवून जगण्याचे बळ देणे गरजेचे आहे, असे समजावून सांगितले. ते अनेकांना पटले. मग आम्ही ग्रामसभेत सर्वानुमते विधवांना सन्मानपूर्वक वागणूक देण्याचा ठराव मंजूर केला.’ कुप्रथांना छेदाचा निर्धार ग्रामपंचायतीत २६ जानेवारी रोजी सरपंच दीप्ती माने यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा पार पडली. या सभेत गावात कोणत्याही प्रसंगाने विधवा झालेल्या महिला भगिनींना सन्मानाचे स्थान देण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. महिलेचे सौभाग्याचे अलंकार पती हयात नसला तरी कायम राहतील, हा ठराव मंजूर करतानाच अनेक कुप्रथांना छेद देण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला. ग्रामपंचायतीचे आदर्श ठराव दोन वर्षांपासून गावात कोणत्याही सणाला किंवा उत्सवास डाॅल्बी लावण्यास बंदी. सायंकाळी सात ते नऊ घरामध्ये मोबाइल आणि टीव्ही बंदी केली आहे. सायंकाळी सात वाजता संपूर्ण गावात भोंगा वाजला की टीव्ही बंद केले जातात. यामुळे मुलांचा अभ्यास होतो. या वेळी मोबाइलही बंद ठेवण्यात येतो. यापुढेही विधायक कार्य करण्याचा ग्रामपंचायतीचा मानस आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)