शिवराज राक्षेने पंचाला गोळ्या घालायला पाहिजे होत्या; पै. चंद्रहार पाटलांचे वादग्रस्त वक्तव्यfile photo
Published on
:
03 Feb 2025, 8:16 am
Updated on
:
03 Feb 2025, 8:16 am
सांगली : Maharashtra Kesari | शिवराज राक्षे याने पंचाला गोळ्या घालायला पाहिजे होत्या, असं वादग्रस्त वक्तव्य डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांनी केले आहे. पंचांच्या निर्णयाला मी देखील बळी पडलो होतो, असा आरोपही चंद्रहार पाटील याने केला आहे.
अहिल्यानगरमध्ये रविवारी रात्री रंगलेल्या कुस्ती स्पर्धेत पुण्याचा बलदंड ताकदीचा युवा मल्ल पृथ्वीराज मोहोळ ६७ वा महाराष्ट्र केसरी ठरला. त्याने सोलापूरच्या धिप्पाड शरीरयष्टी असलेल्या महेंद्र गायकवाडचा पराभव केला. एक-एक गुणाची बरोबरी असताना कुस्तीच्या शेवटच्या चाळीसाव्या सेकंदात पृथ्वीराज मोहोळ याने टाकलेला डाव परतवून लावताना महेंद्र गायकवाड मैदानाबाहेर फेकला गेला. त्यामुळे मोहोळला दोन गुणांची आघाडी मिळाली. त्यावर महेंद्रने आक्षेप घेतला; मात्र पंचांनी तो धुडकावून लावल्याने महेंद्र गायकवाडने मैदान सोडले. पंचांनी तांत्रिक गुणांच्या आधारे पृथ्वीराज मोहोळ याला विजयी घोषित केल्याने पृथ्वीराज मोहोळ २०२५ चा महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरला. दरम्यान, पृथ्वीराज मोहोळ व शिवराज राक्षे यांच्या कुस्तीत राक्षेने पंचाच्या निर्णयावर आक्षेप घेतला. त्यामुळे आखाड्यात काही काळ गोंधळ निर्माण झाला. पंचांनी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला मात्र, शिवराज राक्षे याने पंचांशी हुज्जत घातली. पंचांची गचांडी पकडून लाथ मारली. त्याने आणखी गोंधळ झाला. शिवराज राक्षे याने आलेल्या पाहुण्यांकडे दाद मागितली. मात्र, त्याचाही काही उपयोग झाला नाही. शेवटी संयोजक व कुस्तीगीर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी पंचांचा निर्णय हा अंतिम राहील, असे शिवराज राक्षेला सांगितले. त्यानंतर शिवराज राक्षे याने मैदान सोडले.
'त्या' पंचाला गोळ्या घालायला पाहिजे होत्या
कुस्ती स्पर्धेला वादाचे गालबोट लागले आहे. शिवराज राक्षे याच्या कृत्याच्या समर्थनार्थ आणि विरोधात प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, शिवराज राक्षे याच्या समर्थनार्थ मैदानात आता डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील उतरला आहे. पैलवान शिवराज राक्षे यांनी खरंतर पंचाला गोळ्या घालायला पाहिजे होत्या. आपल्यावर देखील २००९ मध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी होताना अन्याय झाला होता, तसाच अन्याय ट्रिपल महाराष्ट्र केसरी होताना शिवराज राक्षेवर देखील झाल्याचा आरोप पै. चंद्रहार पाटलांनी केला आहे. मी देखील 2009 साली ट्रिपल महाराष्ट्र केसरीची कुस्ती खेळताना पंचांच्या वादग्रस्त निर्णयाला बळी पडलो होतो. ज्यातून त्यावेळी मी आत्महत्या करण्याच्या विचारात होतो, असं देखील चंद्रहार पाटील यांनी स्पष्ट केले आहे. पृथ्वीराज मोहोळचे मी अभिनंदन करतो, त्यात पृथ्वीराजची काही चूक नाही, मात्र पंचाचा निर्णय वादग्रस्त आहे, असेही चंद्रहार पाटील म्हणाले. चंद्रहार पाटलांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.