Published on
:
30 Sep 2024, 2:34 am
Updated on
:
30 Sep 2024, 2:34 am
मुंबई : कृषी क्षेत्रातील महाराष्ट्राची कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात आधुनिक पीक पद्धतीचा अवलंब केला जात असल्याचे प्रकर्षाने दिसले. शेतकर्याची मेहनत व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यामुळे महाराष्ट्र देशात कृषी क्षेत्रातील अग्रगण्य राज्य बनले आहे, अशा शब्दांत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी शेतकर्यांचे कौतुक केले. दरम्यान, ढिसाळ नियोजनामुळे पुरस्कार विजेत्या शेतकर्यांची गैरसोय झाली.
वरळीतील एनएससीआय डोम येथे 2020, 2021 व 2022 या तीन वर्षांच्या कृषी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यावेळी राज्यपाल बोलत होते. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री धनंजय मुंडे, आमदार विक्रम काळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्यपाल म्हणाले, राज्याची एक रुपयात पीक विमा योजनेचा अंगीकार अन्य राज्ये करत आहेत. राज्यात कृषी क्षेत्रात अनुदान योग्य मार्गाने दिले जात आहे. शेततळ्यासाठी अनुदानामुळे शेतीला संरक्षित सिंचन उपलब्ध होत आहे. महाराष्ट्र राज्य कापूस, सोयाबीन, केळी व द्राक्ष उत्पादनात देशात अव्वल आहे. मेहनत व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यामुळे महाराष्ट्र देशात कृषी क्षेत्रातील अग्रगण्य राज्य बनले आहे.
कापूस-सोयाबीन उत्पादक शेतकर्यांना 2 हजार 500 कोटींचे अर्थसाहाय्य वितरित करण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. ते म्हणाले, शेतकर्यांच्या साडेसात अश्वशक्तीपर्यंत कृषी वीजपंपाचे देयक माफ करण्यात आले आहे. पुढील सहा महिन्यांत शेतकर्यांना दिवसा पूर्णपणे वीज मिळणार आहे. शेतकर्यांना 24 हजार कोटी रुपये खर्चून साडेआठ लाख सौर कृषी पंपाचे वितरण करण्यात येणार आहे. शेतकर्यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी देण्यात येणार्या पुरस्काराची रक्कम चौपट करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
शेती क्षेत्रात संशोधन करून शेतकर्यांनी समाजात सुबत्ता आणल्याचे मंत्री मुंडे यांनी सांगितले. यावेळी विविध 448 पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. तसेच, राज्यस्तरीय पीक स्पर्धेतील विजेत्या 154 शेतकर्यांनाही गौरविण्यात आले.