शेवटच्या 3 दिवसांत मतदार याद्यांत घोळ?:सुप्रिया सुळे यांचा राहुल गांधींसोबत आरोप; निवडणूक आयोगाकडे केली मतदार याद्यांची मागणी

2 hours ago 3
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शेवटच्या 3 दिवसांत मतदार याद्यांमध्ये घोळ करण्यात आल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. विरोधक निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असताना हे गौडबंगाल करण्यात आल्याचे त्या म्हणाल्या. त्यांनी या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे मतदार याद्यांची मागणीही केली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील कथित मतदार घोटाळ्यासंबंधी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी नवी दिल्लीत सुप्रिया सुळे व संजय राऊत यांच्या समवेत पत्रकार परिषद घेतली. त्यात राहुल यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अनेक अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप केला. सुप्रिया सुळे यांनीही त्यांच्या सुरात सूर मिसळत शेवटच्या 3 दिवसांत मतदार याद्यांमध्ये बोगस मतदारांची नाव टाकण्याचा आल्याचा गंभीर आरोप केला. प्रचारात व्यस्त असताना घोळ केला सुप्रिया सुळे म्हणाल्या, विधानसभा निवडणुकीपूर्वी ऑनलाईन पद्धतीने नावे वाढवण्यात आली. मी स्वतः त्यावेळी दररोज मॉनिटर करत होते. पण शेवटच्या 3 दिवसांत आम्ही निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असताना बोगस मतदारांची नावे वाढवण्यात आली. लाडकी बहीण योजनेतही बोगस आधार कार्ड मिळाले आहेत. आता आमच्यापुढे मतदार, निवडणूक चिन्ह व पक्ष फोडण्याचा विषय आहे. आमच्यावर सतत वार होत आहेत. पण लोकशाही सशक्त ठेवण्यासाठी निष्पक्ष निवडणूक घेण्याची गरज आहे. यासाठी आम्ही निवडणूक आयोगाकडे केवळ मतदार याद्यांची मागणी करत आहोत. ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या सुप्रिया सुळे यांनी यावेळी निवडणूक ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्याची जोरदार मागणी केली. त्या म्हणाल्या, आमच्या पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे माढा लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यांच्या मतदारसंघातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातून उत्तम जानकर विजयी झालेत. पण त्यांनी आपल्याला जेवढी मते मिळायला हवीत, तेवढी मते मिळाली नसल्याचा आरोप केला आहे. त्यांची निवडून येऊनही पुन्हा बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची इच्छा आहे. तेथील मारकडवाडी गावातील नागरिकांनी अशी मागणी केली आहे. पण निवडणूक आयोग ही निवडणूक पुन्हा घेण्याचे धाडस दाखवत नाही. कहर म्हणजे मनसेच्या एका उमेदवाराला त्याचे स्वतःचेही मत पडले नाही. राज ठाकरे यांनी स्वतः ही गोष्ट बोलून दाखवली आहे. अशा अनेक गंभीर गोष्टी या निवडणुकीत घडल्या आहेत. त्यामुळे अनेक नेत्यांनी व पक्षांनी ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. हा सर्व डेटा सार्वजनिक आहे, असे त्या म्हणाल्या. सेम चिन्हांमुळे साताऱ्यासह 11 जागांवर फटका त्या पुढे म्हणाल्या, महाराष्ट्रात आमचा पक्ष फोडण्यात आला. आमदार फोडण्यात आले. पण अजूनही आम्ही व शिवसेना तिथे लढत आहोत. आम्हाला तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह देण्यात आले. पण आमच्या विरोधात एका उमेदवाराला ट्रम्पेट अर्थात तुतारीचे चिन्ह देण्यात आले. या दोन्ही चिन्हांमध्ये साधर्म्य आहे. त्यामुळे आम्ही चिन्ह बदलण्याची मागणी केली. पण ती फेटाळण्यात आली. याच कारणामुळे आमची साताऱ्याची जागा गेली. आम्हाला जवळपास 11 जागांवर फटका बसला. सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणी महायुती सरकारच्या एका मंत्र्याने केलेल्या एका विधानाचाही दाखला दिला.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article