सोयाबीन हमीभाव खरेदीची मुदत संपली, योजनेपासून अनेक वंचित, मुदतवाढ द्या:अन्यथा सोमवारपासून संसदेसमोर आंदोलन- खा. नीलेश लंके

2 hours ago 2
महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या सोयाबीन हमीभाव खरेदीची मुदत गुरुवारी (६ फेब्रुवारी) संपली. मात्र, हमीभाव केंद्रात आलेल्या अडचणींमुळे अनेक सोयाबीन उत्पादक शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. त्यामुळे सोयाबीन हमीभाव खरेदी योजनेची मुदत किमान एक महिन्याने वाढवावी, अन्यथा सोमवारी (१० फेब्रुवारी) संसदेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्याचा इशारा खासदार नीलेश लंके यांनी दिला आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनानिमित्त खासदार लंके सध्या दिल्लीत आहेत. त्यांनी गुरुवारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन विविध प्रश्नांवर चर्चा केली. या भेटीनंतर त्यांनी पवार यांच्या निवासस्थानाबाहेर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. खा. लंके म्हणाले की, सोयाबीन हमीभाव खरेदी योजना सुरू झाल्यावर सुरूवातीला सोयाबीनमध्ये जास्त ओलावा असल्याचे कारण देत खरेदी केंद्रावर सोयाबीन नाकारण्यात आले. त्यानंतर बारदाण्याचा तुटवडा असल्याचे कारण देत खरेदी थांबवली. या गोंधळातच ३१ जानेवारी रोजी या योजनेची मुदत संपली. अनेक शेतकरी सोयाबीन हमीभाव योजनेपासून वंचित राहिले. शेतकऱ्यांची ओरड झाल्यानंतर सरकारने अवघ्या ६ दिवसांची, ६ फेब्रुवारीपर्यंत योजनेला मुदतवाढ दिली. मुदतवाढ मिळाल्याची माहिती सोयाबीन उत्पादकांना मिळेपर्यंत वाढीव मुदतही संपली. अद्याप, मोठ्या प्रमाणावर सोयाबीन शेतकऱ्यांचा घरात पडून आहे. व्यापारी सोयाबीन उत्पादकांची लूट करीत आहेत. शेतकऱ्यांना आधार, दिलासा देण्यासाठी सोयाबीन हमीभाव खरेदी योजनेची मुदत किमान एक महिन्याने वाढवणे आवश्यक असल्याचे खासदार लंके म्हणाले. आपण यासंदर्भात संबंधित केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादकांचे गाऱ्हाणे, त्यांना खरेदी केंद्रावर आलेल्या अडचणी, त्यांच्या कानावर घालणार असल्याचे खा. लंके यांनी स्पष्ट केले. योजनेच्या शेवटच्या दिवशी महाराष्ट्रातील सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रावर सोयाबीन घेऊन आलेल्या शेतकऱ्यांच्या वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र होते. सहा दिवसांची मुदतवाढ देऊन काही होत नाही. किमान एक महिन्याची मुदतवाढ द्यायलाच हवी. शेतकऱ्यांना द्यायचे असेल, तर मोकळ्या मनाने दिले पाहिजे, असे खा. लंके म्हणाले. सोयाबीनची खरेदी झाली नाही, तर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे. व्यापारी कवडीमोल भावाने सोयाबीन खरेदी करतील. शेतकरी हा महत्वाचा घटक आहे. तो अन्नदाता आहे. शेतकरी सुखी राहिला, तर देश सुखी राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठिशी, शेतकऱ्यांबरोबर राहिले पाहिजे, अशी आपली भूमिका आहे. संसदेत आल्यानंतर मी पहिला प्रश्न दूध, कांदा, सोयाबीनचा मांडला होता. यावेळच्या अधिवेशनातही शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर मागण्या केल्याचे खा. लंके यांनी सांगितले. सेवानिवृत्त शिक्षकांचे काही प्रश्न आहेत. या प्रश्नांसदर्भात विशेषतः अर्थमंत्र्यांशी मी पत्रव्यवहार केला आहे. या प्रश्नासंदर्भात निर्मला सीतारामण यांच्यासमवेत बैठक घेण्यासंदर्भात आपण शरद पवार यांची भेट घेतल्याचे खा. लंके यांनी सांगितले. छत्रपती संभाजीनगर-नगर, सुपे-पुणे रेल्वेसाठी आग्रही छत्रपती संभाजीनगर, वाळुंज, देवगड, शिर्डी, शनिशिंगणापूर, अहिल्यानगर, सुपा-पारनेर एमआयडीसी, रांजणगाव एमआयडीसी व पुणे या मार्गावर रेल्वेसेवा हवी, अशी आमची मागणी आहे. त्यासाठी आम्ही आग्रही आहोत. त्यासंदर्भात रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा करीत असल्याचे खासदार लंके यांनी सांगितले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article