'ऑपरेशन टायगर' होणारच मात्र टप्प्याटप्प्याने:मंत्री उदय सामंत यांचा दावा; म्हणाले - 'एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व उद्धव ठाकरेंपेक्षा चांगले'

3 hours ago 1
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले काम पाहून अनेक नेते आणि कार्यकर्ते हे शिवसेनेत प्रवेश करण्याची तयारी दाखवत आहेत. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेणारी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात चालते, हे आता लोकांना कळून चुकले आहे. त्यामुळे अनेक लोक संपर्कात आहेत, हे निश्चित आहे. मात्र, टप्प्याटप्प्याने त्यांचा प्रवेश होईल, असे म्हणत मंत्री उदय सामंत यांनी पुन्हा एकदा 'ऑपरेशन टायगर' संदर्भात संकेत दिले आहेत. 'ऑपरेशन टायगर' होणार आहे. मात्र ते टप्प्याटप्प्याने होणार असल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच उद्धव ठाकरे गटाच्या खासदारांचा शिवसेना पक्षात पक्षप्रवेश होणार आहे. या वक्तव्यावर आजही मी ठाम आहे. आमदार, खासदार देखील आमच्या संपर्कात असल्याचे उदय सामंत यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व उद्धव ठाकरे गटापेक्षा चांगले आहे, हे आता लोकप्रतिनिधींना देखील समजले आहे. एकनाथ शिंदे हे संवेदनशील नेत आहेत. त्यामुळे अनेक लोक आमच्या संपर्कात असल्याचा दावा उदय सामंत यांनी केला आहे. बालिश राजकारण कोणीही करू नये, विजय वडेट्टीवार यांना टोला काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील उदय सामंत यांच्या संदर्भात भाजप प्रवेशाबाबत वक्तव्य केले होते. मी आणि तुम्ही दोघेही भाजपमध्ये प्रवेश करू, असे उदय सामंत यांनी म्हटल्याचे त्यांनी सांगितले होते. या वडेट्टीवारांच्या दाव्यावर देखील उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. वडेट्टीवार यांनी आधी आपल्या पक्षाची परिस्थिती काय? ते पहावे, अशा शब्दात उदय सामंत यांनी वडेट्टीवार यांना प्रत्युत्तर दिले आहे. विजय वडेट्टीवार हे माझे अतिशय चांगले मित्र आहेत. राजकारणाच्या पलीकडे आमची मैत्री आहे. मात्र एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासात त्यांना कुठेही त्रास होईल, असे कुठलेही कृत्य आमच्याकडून होणार नाही. हे बालिशपणाचे राजकारण आहे. बालिश राजकारण कोणीही करू नये, असा टोला त्यांनी विजय वडेट्टीवार यांना लगावला आहे. खासदारांच्या बाबतीत पडद्यामागची जुळवणी पूर्ण लोकसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गटाला चांगले यश प्राप्त झाले आहे. मात्र, देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन झाले. त्यामुळे पुढची पाच वर्षे सत्ताधारी पक्षात बसण्याची ठाकरे गटाच्या खासदारांची इच्छा आहे. मात्र, आता पक्ष फुटला तर पक्षांतर बंदी कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. या कायद्यातून वाचायचे असेल तर सहा खासदारांचा आकडा महत्त्वाचा आहे. त्यामुळे सहा खासदारांचे मन वळवण्यात शिंदे गटाला यश आले असल्याचे बोलले जात आहे. या खासदारांच्या बाबतीत पडद्यामागची जुळवणी पूर्ण झाली असून लवकरच हे सहा खासदार शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी केलेल्या वक्तव्याकडे पाहिले जात आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article