हिंगोली जिल्ह्यात तब्बल ४५०० हेक्टर क्षेत्रावर १८१४ शेतकऱ्यांनी बोगस पिकविमा भरल्याचे प्राथमिक तपासणीमध्ये स्पष्ट झाले असून यामध्ये परजिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश असल्याचा संशय आहे. त्यानुसार आता या शेतकऱ्यांची तसेच अभिलेख्यांची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा अधिक्षक कृषी अधिक्षक कार्यालयाने दिले आहेत. हिंगोली जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामात सुमारे २.५० लाख शेतकऱ्यांनी पिकविमा भरला आहे. यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन, कापूस, तुर या पिकांचा समावेश आहे. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्हयातील शेतकऱ्यांना पिकविमा मिळण्याची प्रतिक्षा अाहे. तर जिल्हयात झालेल्या नुकसानीचा अहवाल देखील महसूल विभागाने शासनाकडे सादर केला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील शेतकऱ्यांन पिकविमा द्यावा यामागणीसाठी शेतकरी संघटनेेचे नामदेव पतंगे, गजानन कावरखे, गजानन सावके यांच्यासह शेतकऱ्यांनी वेळोवेळी प्रशासनाकडे निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे. मात्र अद्यापही पिकविमा संदर्भात कुठल्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही. दुसरीकडे, राज्यातील इतर जिल्ह्यांत बोगस पिकविमा भरल्याचे उघड झाल्यानंतर हिंगोली जिल्ह्यातही कृषी विभागाने प्राथमिक चौकशी केली आहे. या चौकशीमध्ये ७६ शेतकऱ्यांनी २०७ हेक्टर क्षेत्रावरील शासकिय जमीनीवर पिकविमा भरला असून त्यात १.१२ कोटी रुपयांची पिकविमा रक्कम संरक्षित केली आहे. यामध्ये १९ शेतकऱ्यांनी स्वतः तर ५७ शेतकऱ्यांनी सीएससी केंद्रावरून पिकविमा भरला आहे. या शिवाय १७३८ शेतकऱ्यांनी ४३०९ हेक्टर क्षेत्राचा पिकविमा भरला असून त्यातून २३.५२ कोटी रुपयांची रक्कम विमा संरक्षित केली आहे. यामध्ये ८६ शेकतऱ्यांनी स्वतः तर १६५२ शेतकऱ्यांनी सीएससी सेंटरवर विमा भरला आहे. विशेष म्हणजे या विमाधारक शेतकऱ्यांच्या जमीनीची महसूल अभिलेख्याला नोंदच नसल्याचे समोर आले आहे. त्यानुसार जिल्ह्यात एकूण १८१४ शेतकऱ्यांनी ४५१७ हेक्टर क्षेत्रावर बोगस पिकविमा भरल्याचे स्पष्ट होत असून या शेतकऱ्यांनी २४.६४ कोटी रुपयांची रक्कम विमा संरक्षित केल्याचे दिसून आले आहे. या शेतकऱ्यांबाबत संशय आल्यामुळे आता या प्रकाराची चौकशी सुरु करण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यात बोगस पिकविमा भरणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये काही बाहेर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचाही समावेश असल्याचे सुत्रांनी सांगितले. कृषी विभागाने दिले चौकशीचे आदेश या प्रकरणात जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राजेेंद्र कदम यांनी हिंगोलीसह सेनगाव, औंढा नागनाथ, वसमत, कळमनुरी तालुका कृषी अधिकारी कार्यालयांना पत्र पाठविले आहे. यामध्ये या संशयीस बोगस पिकविम्याची कृषी सहाय्यकामार्फत १०० टक्के तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता या चौकशीमध्ये काय स्पष्ट होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय - शेतकरी जिल्हयात यावर्षी खरीप हंगामात पिकविमा भरलेल्या शेतकऱ्यांना नुकसान होऊन देखील पिकविमा मिळाला नाही. तर दुसरीकडे बोगस पिकविमा भरल्या गेल्याचे उघड होत आहे. हा जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय ओह. कृषी खात्याने या बोगस शेतकऱ्यांवर कारवाई करावी तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकविमा देऊन न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी नामदेव पतंगे व गजानन कावरखे या शेतकऱ्यांनी केली आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)