ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशानं गेल्या वर्षी लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. जुलैपासून ते जानेवारीपर्यंत एकूण सात हाप्ते या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. या योजनेला महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येण्यामध्ये देखील या योजनेचा मोठा वाटा असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान आमचं सरकार आलं तर आम्ही महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला 2100 रुपये जमा करू अशी घोषणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी महायुतीकडून करण्यात आली होती. आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये 2100 रुपये कधी जमा होणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. येत्या अर्थसंकल्पानंतर महिलांच्या बँक खात्यामध्ये 2100 रुपये जमा होण्याची शक्यता आहे.
मात्र दुसरीकडे जर महिलांच्या खात्यात 2100 रुपये जमा केल्यास त्याचा मोठा आर्थिक तान हा अर्थव्यवस्थेवर येऊ शकतो असं देखील बोललं जात आहे, इतर योजनेचा पैसा हा लाडकी बहीण योजनेकडे वळवल्यानं इतर योजना ठप्प झाल्याचा आरोप विरोधकांकडून सुरू आहे. त्यामुळे ही योजना ठप्प होणार का? अशी देखील चर्चा सुरू झाली आहे, याबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे, मंत्री शंभूराज देसाई यांनी या योजनेबाबत बोलताना मोठा खुलासा केला आहे. लाडकी बहीण योजनेमुळे काहीही थकीत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. लाडक्या बहिणी गोरगरीब कुटुंबातील महिला आहेत, त्यामुळे ही योजना सुरूच राहणार असल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. तसेच सरकार मागील वर्षीचा स्पिल ओव्हर या वर्षीच्या आर्थिक वर्षात भरून काढणार आहे, असं देखील यावेळी शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे. फेब्रुवारीचा हाप्ता देखील लवकरच खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे.